

महाड : श्रीकृष्ण द बाळ
महाड तालुक्याच्या पश्चिम दिशेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बंदर म्हणून विकसित असलेल्या व परिसरातील टेहळणी करण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेल्या दौलत गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या दासगावमधील ग्रामस्थांचा व पर्यटकांचा नौका विहार या संगम पात्रामध्ये निर्माण झालेल्या गाळामुळे अडकला आहे. आगामी काळात तातडीने येथील गाळ उपसा काढला नगेल्यास नागरिकांनासमस्येला सामोरे जावे लागणार आहे.
या संगम परिसरातील गाळ उपसा तातडीने पूर्ण केला गेल्यास नौका विहाराच्या. माध्यमातून स्थानिक ग्रामस्थांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे.या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिक ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेमधून निदर्शनास आले की, महाड -दासगाव खाडीमध्ये संगम परिसरात मोठ्या प्रमाणात तयार झालेला गाळ उपसा झाल्यास पूर्वापार सुरू असलेली आणि गेली अनेक वर्ष ठप्प राहिलेली नौका विहार पुन्हा सुरू होऊ शकतो.
या नौकाविहारामुळे दासगाव परिसराच्या विकासामध्ये चालना मिळू शकते. महाड शहर हे पूर्वीचे व्यापारी ठिकाण होते. आजही रायगडमध्ये सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून महाड कडे पाहिले जाते. शहराजवळ हबस तलाव आहे. या ठिकाणी बोटीने येणारे हबशी लोक आंघोळीसाठी यायचे म्हणून या तलावाला हबस तलाव म्हटले जाते. महाडमध्ये गलबत्तांद्वारेच साहित्य आणले जात होते.यामार्गाने मेंगलोरमधून बोटींद्वारे महाडमध्ये कौलांची वाहतूक होत असे.
शेकडो वर्षापूर्वी सावित्री खाडीतून होणारी जलवाहतूक थांबली आहे. खाडीत असणारा गाळ काढण्याच्या प्रक्रियेला काही वर्षांपूर्वी सुरुवात झाली असली तरी गेली अनेक वर्ष नौका नयन मार्ग सुरळीत होण्याचे कारण दाखवून रेती उपसा होत आहे.
मात्र तरीदेखील जल वाहतूक सुरू झालेली दिसून येत नाही. दासगावमध्ये खाडीचा काही भाग येऊन मिळतो. या ठिकाणी सावित्री नदी खाडी आणि नागेश्वरी नदीचे पाणी येऊन मिळत असल्याने या संगम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ तयार झाला आहे.
सध्या उपसा केला जाणारा गाळ हा शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्याने नौका विहार मार्ग सुकर करण्याचा हेतू साध्य होत नसल्याचे दिसून येत आहे. संगम परिसरात गाळ काढून टाकल्यास नदीची खोली वाढून छोट्या होड्या, गलबते पुन्हा सुरू होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास दासगावसह परिसराचा विकास होणार आहे.
दासगाव हे पूर्वीचे बंदर ठिकाण असल्याने या ठिकाणी सावित्री नदी आणि परिसरामध्ये होड्या लागण्यासाठी सागरी, बंदर विकास महामंडळातर्फे जेटीचे काम करण्यात आलेे. यामुळे जलमार्ग सुरू झाल्यास पर्यटन आणि प्रवासी सुविधा देखील सोपे होणार आहे.
महाड शहरानजीक गेली दोन वर्षापासून सावित्री खाडीमध्ये गाळ उपसा सुरु आहे. मात्र ज्या ठिकाणी गाळ उपसण्याची गरज आहे त्या ठिकाणी प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. दासगाव या खाडीचे संगम आहे.या ठिकाणी साचलेल्या गाळाचा उपसा झाला तर पुराची भीती दूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जानकाराचे म्हणणे आहे आणि खाडीची पातली खोल होऊन दलन वलन आणि पर्यटनाला चालना मिळेल. तरी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
सावित्री आणि नागेश्वरी च्या संगमवरील दासगाव हद्दीत साचलेला गाळ काढणे गरजेचे आहे.जेणे कडून उपशा नंतर पर्यटन व्यवसाय अन्य स्थानिक व्यवसाय तसेच जलवाहतुकीला चालना मिळाल्याने परिसरातील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.
पांडुरंग सूर्यकांत निवाते, सामाजिक कार्यकर्ते दासगाव.