महाड : पुढारी वृत्तसेवा
महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली. या आगीमध्ये नऊ गुरे जळून खाक झाली आहेत. ऐन शेतीच्या हंगामात ही घटना घडल्याने दोन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, देशमुख कांबळे या गावी मध्यरात्री दीड वाजता गोठ्याला अचानक आग लागली. या दरम्यान या भीषण आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला. या गोठ्यामध्ये देशमुख कांबळे येथील शेतकरी प्रभाकर देशमुख व किशोर देशमुख यांची गुरे बांधली होती.
आग विझविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, परंतु तरीही या गोठ्यातील नऊ गुरांचा जळून मृत्यू झाला. महसूल विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.