पोलादपूर ः आंबेनळी घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक धोक्याची झाली आहे. 14 दिवसांत चारवेळा दरड कोसळली आहे. शनिवारी घाटमार्गावर झालेल्या पावसात पुन्हा दरड कोसळली आहे. त्यामुळे घाटात वाहतूक कोंडी झाली होती. सुरुवातीला चार दिवस घाट बंद करण्यात आला होता. 15 जुलैनंतर हलकी वाहने सुरू करण्यात आली असून 15 ऑगस्टपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
सुरेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे संपूर्ण काम सोपविण्यात आले असून, सततच्या पावसामुळे कामकाज संथगतीने सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून हा घाट दरडी व मातीमुळे अधिक चर्चेत आहे. शनिवारी दुपारी चिरेखिंड बावली टोक जवळ दरड खाली आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या दरडीची माहिती मिळताच प्रशासन आणि संबधित अधिकारी वेळेवर घटनास्थळी दाखल होत जेसीबीच्या साह्याने माती व दरड बाजूला करत वाहनांना मार्ग मोकळा वाहतूक सुरळीक करण्यात आली.
तहसीलदार कपिल घोरपडे आणि पोलीस एपीआय आनंद रावडे हे घाट रायगड हद्दीतील पोलादपूर तालुक्यातील घाट परिसरात लक्ष ठेवून पाहणी करत आहेत. चिरेखिंड बावली परिसरात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद झाला होता. मात्र, कंपनीचे अभियंते आणि प्रशासन यांच्यात समन्वय ठेवत तातडीने काम सुरूकरत एकेरी मार्ग सुरू करण्यात आला आहे.