

ऋषिता तावडे
रायगड: सिग्नल यंत्रणा सक्षम करण्यासाठी ९९.६८ कोटी खर्चून ‘कवच’ सुरक्षा प्रणाली बसवली जाईल. ११ रेल्वे फाटकांच्या जागी उड्डाणपूल उभारून मानवरहित फाटकांचा प्रश्न २७१.२२ कोटी खर्चून सोडविला जाईल.
वहनक्षमता वाढावी म्हणून नवीन क्रॉसिंग स्टेशन तर गोकर्ण रोड, होन्नावर, बारकूर, हरवाडा व अंकोला येथे ४२५.५५ कोटी खर्चून लूप लाइन उभारणार. तर १०४.९८ कोटींच्या सुविधा दिल्या जातील.
जुन्या ट्रॅक मालमत्तांच्या बदलासाठी ३६३.८२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. भूस्खलनप्रवण २० ठिकाणी जिओ - टेक्निकल स्थिरीकरण, विविध बोगद्यांची देखभाल तसेच ४८ स्थानकांवरील जुन्या इंटरलॉकिंग यंत्रणांच्या जागी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीसाठी ३०१.२५ कोटींचाप्रस्ताव आहे.
मुंबई, गोवा, कर्नाटक आणि केरळला जोडणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. नवीन बोगदे, अतिरिक्त लूप लाइन, कवच सुरक्षा प्रणाली आणि सिग्नलिंग आधुनिकीकरणामुळे मार्गाची क्षमता, सुरक्षितता आणि वेळपालनात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा संतोषकुमार झा यांनी व्यक्त केली.
कोकण रेल्वे मार्गापैकी ९० टक्क्यांहून अधिक भाग आजही एकेरी असल्याने या मार्गावरील वाढती वाहतूक, वारंवार विस्कळीत होणारे वेळापत्रक आणि गणेशोत्सवाच्या काळातील अतिरिक्त गाड्यांचे नियोजन ही आव्हाने कोकण रेल्वे समोर आजही कायम आहेत.
या पार्श्वभूमीवर गेल्या दशकभरापासून चर्चेत असलेल्या कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण प्रकल्पाला नवी चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून पुढील टप्प्यातील कामांसाठी कोकण रेल्वे महामंडळाने केंद्र सरकारकडे निधीचा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच प्राधान्याच्या विभागांमध्ये तांत्रिक तपासणीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.