

खोपोली: पेशवेकालीन विरेश्वर मंदिरात शंकराच्या पिंडीवरील सुमारे १२ किलो वजनाचे चांदीचे आच्छादन चोरल्याची घटनेने खोपोली शहरात खळबळ उडाली असून वरची खोपोलीतील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेऊन पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. यावेळी चोरीचा छडा लावून चोरट्यांना जेरबंद केले जाईल,अशी ग्वाही पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे.
खोपोलीतील ऐतिहासिक शिवकालीन विरेश्वर मंदिरात धाडसी चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील लोखंडी दरवाजाचे कुलप तोडून दोन चोरट्यांनी प्रवेश करून भगवान शंकराच्या पिंडीवरील सुमारे १२ किलो वजनाचे अंदाजे २० लाख रुपये किमतीचे चांदीचे आच्छादन चोरल्याची घटना घडली आहे.
मंदिरातील चोरीबरोबर बाजारपेठेतील दोन पान टपरीही फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.खोपोली पोलिसांनी तपाचे चक्र फिरवत तांत्रिक विश्लेषक आणि गुप्तचर यंत्रणेची मदतीने तपास सुरू केला आहे.तपास अधिक गतीने करण्यासाठी रायगड पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी पोलिसांना आदेश दिले.
रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांची श्री वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ शंकर मंदिर वरची खोपोलीचे ज्येष्ठ सल्लागार माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, अध्यक्ष विकास जोशी,सल्लागार मनेश यादव,नितीन जोशी,संतोष गायकर तसेच संजय जाधव,सचिन येवले,मयुर रेटरकर तेजश कांबळे,सचिन येवले,संदेश येवले आणि दिनेश गुरव तसेच श्री वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ शंकर मंदिर वरची खोपोलीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
चर्चेदरम्यान नागरिक झाले आक्रमक
मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेनंतर दलाल यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच सविस्तर माहिती घेवून आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याच्या सूचना देत तपास अधिक गतीने करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.