

कर्जत: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आले आहेत. ही बाब जरी चांगली असली तरी या टाक्या वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचे असते, मात्र असे असूनही कर्जत तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ह्या स्वच्छ केलेल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे या टाक्यांमधील दूषित पाणी पिऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. एकंदरच या सर्व प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
त्यातच एप्रिल आणि मे हे दोन महिने सुट्टी असल्याने शाळा बंद होत्या. साहजिकच त्यामुळे या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये साचलेले पाणी त्यामुळे शेवाळे, माती साचून राहिलेली आहे. यामुळे या टाक्यांमध्ये शाळा सुरू झाल्यावर टाक्यांची स्वच्छता न करताच त्या मध्ये पाणी भरण्यात आले तर ते पाणी दूषित होऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम करू शकते. यापूर्वी काही शाळांमध्ये टाक्या स्वच्छता केल्यावर त्या दिवसाची तारीख त्या टाक्यांवर नोंद करण्यात येत असे. मात्र आता तसे दिसून येत नाही.
नुकतंच काही शाळांचा पाहणी दौरा केला असता असे लक्षात आले की या पाण्याच्या टाक्याभोवती जंगली झाडाझुडपांनी विळखा घातला आहे. त्यामुळे पावसाळ्यात तेथे विषारी साप विंचू यांचाही प्रादुर्भाव वाढू शकतो हे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे याचबरोबर शाळेच्या परिसरातही झाडांच्या तुटलेल्या फांद्या पालापाचोळा अन्य कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला दिसून येत आहे.
15 जूनला जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार आहेत त्यामुळे अवघे दहा दिवस उरले असूनही या शाळांमध्ये कुठलीही स्वच्छता मोहीम हाती घेतलेले सद्यस्थितीत तरी दिसून येत नसल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या सर्व बाबींची दखल घेऊन कर्जत पंचायत समिती शिक्षण विभागाने त्वरित सकारात्मक पावले उचलत या सर्व जिल्हा परिषद शाळांमधील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून विद्यार्थ्यांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा होईल याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा शिक्षण विभाग शाळांच्या स्वच्छतेचे काय निर्णय घेते, काय कारवाई करते याच्याकडे पालकवर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.
39 शाळांची दुरुस्ती
कर्जत तालुक्यात एकूण 271 प्राथमिक शाळा आहेत या शाळांमध्ये 724 शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत 2025- 26 मध्ये पडझड झालेल्या शाळांचे दुरुस्ती प्रस्ताव पाठविण्यात आले होते यापैकी 39 शाळांचे प्रस्ताव मंजूर होऊन त्यांची कामे सुरू आहेत.
15 जूनला शाळा सुरू होणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे विशिष्ट पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. तसेच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळेतील पटसंख्या अधिक कशी वाढेल यावरही भर दिला जाणार आहे.
- अनंत खैरे गटशिक्षणाधिकारी, कर्जत