

नेरळ : आनंद सकपाळ
खरीप हंगामातील पिकांना खताची सर्वाधिक गरज असतानाच कर्जत तालुक्यात युरिया खताच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कृषी विभागाच्या १९ ऑगस्ट २०२६ रोजीच्या अधिकृत अहवालानुसार, तालुक्यात आतापर्यंत १,१३२.५६ मेट्रिक टन युरियाची आवक झाली असून त्यापैकी १,०८२.२६ मेट्रिक टन युरियाची विक्री झाल्याची नोंद आहे.
त्यामुळे सध्या केवळ ५०.३० मेट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक असून, मागणी मात्र तब्बल ४०० मेट्रिक टन असल्याचे स्पष्ट झाले आहे. कागदोपत्री आवक-विक्रीचे मोठे आकडे असतानाही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याच्या तक्रारींमुळे खत वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कर्जत तालुका कृषी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्याकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार, तालुक्यात युरियासह एलपीकेएस आणि एसएसपी या खतांची मिळून १,४१३.५६ मेट्रिक टन आवक झाली आहे. त्यापैकी १,३२०.५४ मेट्रिक टन खताची विक्री झाल्याची नोंद असून ९३.०२ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. यामध्ये एलपीकेएसचा ३०.६२ मेट्रिक टन आणि एसएसपीचा १२.१० मेट्रिक टन साठा आहे. या तिन्ही खतांची एकूण मागणी ४८० मेट्रिक टन असल्याचेही अहवालातून स्पष्ट होते.
कृषी विभागाच्या नोंदीनुसार, २० एप्रिल ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कर्जत तालुक्यातील विविध विक्रेते व संस्थांमार्फत युरियाच्या अनेक खेपा दाखल झाल्या. सुहास ॲग्रो ट्रेडर्स, कर्जत तालुका एसकेव्हीएस, युगंधरा कृषी सेवा केंद्र, मोक्षदा ॲग्रो सेंटर, प्रचित ॲग्रो डेव्हलपर, समर्थ कृषी सेवा केंद्र यांच्यासह विविध विक्रेत्यांकडे युरियाचा पुरवठा करण्यात आल्याची नोंद आहे.
२० एप्रिल रोजी सुहास ॲग्रो ट्रेडर्समार्फत २५.०२ मेट्रिक टन युरियाच्या पुरवठ्यापासून सुरू झालेल्या या नोंदी ऑगस्टपर्यंत आहेत. १६ ऑगस्ट रोजी प्रचित ॲग्रो डेव्हलपरमार्फत २५.०२ मेट्रिक टन युरियाची आवक झाल्याची शेवटची नोंद आहे. या सर्व नोंदींची एकत्रित आकडेवारी १,१३२.५६ मेट्रिक टन इतकी आहे.
आता प्रत्यक्ष तपासणीचे आव्हान
एकीकडे कृषी विभागाच्या कागदोपत्री अहवालात १,१३२.५६ मेट्रिक टन युरियाची आवक आणि १,०८२.२६ मेट्रिक टन विक्री झाल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे शेतकरी युरिया उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी करीत आहेत. त्यामुळे या विरोधाभासाची वस्तुनिष्ठ पडताळणी करण्याची जबाबदारी आता प्रशासनावर आहे.
तालुक्यात युरिया खताची कमतरता अनुदानित दरातील युरियाची एक बॅग मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जत, कशेळे, कडाव, नेरळ आदी बाजारपेठांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. या फेऱ्यांमध्ये वेळ आणि प्रवासाचा खर्च होत आहे. अनेकदा हेलपाटे मारूनही खताची बॅग मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पदरमोड होत आहे. अशा पीडित शेतकऱ्यांशी संपर्क करून युरिया खताच्या तुटवड्याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल आणि संबंधित विभागाकडे चौकशीची मागणी करण्यात येईल.
अंकुश शेळके, प्रगतशील शेतकरी तथा उपाध्यक्ष, शेतकरी सल्ला समिती, कर्जत