

नेरळ : कर्जत पोलीस ठाणे यांचेकडील रिपोर्टनुसार एकुण 06 सामाईक गुन्हे, 4 स्वतंत्र गुन्हे व एकुण 17 अदखलपात्र गुन्हे टोळीतील इसमांना दोन वर्षे मुदतीकरीता रायगड जिल्ह्यातुन तसेच रायगड जिल्ह्याचे लगतचे असलेल्या पुणे, मुंबई, नवी मुंबई व ठाणे या जिल्हयांतुन हद्दपार करण्याचे आदेश रायगड पोलीस अधीक्षक यांनी निर्गमीत केले आहेत.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरज राम जाधव वय वर्ष 25, आमराई, कर्जत, जि. रायगड टोळी प्रमुख, गणेश सोमनाथ साळुंखे वय वर्ष 24, रा.आमराई, ता. कर्जत, जि. रायगड टोळी सदस्य, सोहेल सिध्दीकी अन्सारी वय वर्ष 25, रा.आमराई, ता. कर्जत, जि. रायगड टोळी सदस्य, विकी मारुती जाधव वय वर्ष 30, रा.आमराई, ता. कर्जत, जि. रायगड टोळी सदस्य या चार जणांच्या टोळीने एकुण 06 सामाईक गुन्हे, 4 स्वतंत्र गुन्हे व एकुण 17 अदखलपात्र गुन्हे केले आहेत.
सदरची टोळी ही त्यांच्या आर्थिक फायद्याकरिता तसेच त्यांची दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने कर्जत शहर व परिसरात त्यांच्या इच्छेविरुध्द कोणाही सर्वसामान्य नागरिकाने त्यांना विरोध केल्यास अशा लोकांच्या विरुध्द सराईतपणे बेकायदेशिर जमाव करुन तसेच गरजेनुसार स्वतःच आक्रमक होऊन शरिराविरुध्दचे गुन्हे सातत्याने व सलगतेने करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात या टोळीविषयी भिती व दहशत निर्माण झालेली आहे.
टोळी प्रमुख तसेच टोळीतील सदस्य हे अत्यंत धाडसी व बेडरवृत्तीचे झालेले असून त्यांचविरुध्द दाखल गुन्ह्यात त्यांना अटक करून त्यानंतर ते बाहेर सुटल्यावर त्यांचे गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवले आहे. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांचेत सुधारणा होत नाहीत. यावरुन त्यांना कायद्याचा धाक राहीलेला नाही असे दिसून येते.
त्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना पायबंद घालण्याकरिता, समाजातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता, सर्वसामान्य नागरीकांना शांततामयरित्या त्यांच्या जीवनाचा उपभोग घेण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्याकरिता आणि टोळी प्रमुख आणि टोळीतील सदस्य यांच्या वर्तणूकीमध्ये सुधारणा व्हावी, ते करीत असलेली गुन्हयांची मालिका खंडीत व्हावी आणि त्यांच्यावर प्रचलीत कायद्याचे बंधन रहावे याकरिता पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग यांनी टोळीतील इसमांना दोन वर्षे मुदतीकरीता रायगड जिल्ह्यातून तसेच रायगड जिल्ह्याचे लगतचे असलेल्या पुणे, मुंबई, नवी मुंबई व ठाणे या जिल्हयांतुन हद्दपार करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत.
रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाणे हद्दीत राहणारे इसमांच्या हे त्यांची गुन्हेगारी टोळी तयार करुन सातत्याने व सलगपणे शरिराविरुध्दचे गुन्हे करीत आहेत. त्यांचे विरुध्द दाखल दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे पाहता ते धोकादायक व धाडसी वृत्तीचे सराईत गुन्हेगार बनले आहेत. तसेच ते यापुढे यापेक्षा गंभीर गुन्हे करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन सार्वजनिक शांतता भंग घडवून आणण्याची परिस्थिती निर्माण झालेली असून त्यांच्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या जिवित व मालमत्तेचे संरक्षण करण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे.