

उरण: तालुक्यातील जांभूळपाडा येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शंकर लक्ष्मण कातकरी (वय 20) या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात फिर्यादी अजय कातकरी (वय 24) यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋतीक राजेंद्र जाधव (वय 25) याने दोघांना आपल्या घरी बोलवून घेतले.
तिथे त्यांच्यात वाद झाला आणि आरोपीने शिवीगाळ सुरू केली. वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त ऋतीकने घरातील चाकू आणून शंकर यांच्या पोटावर आणि पाठीवर सपासप वार केले, ज्यात शंकर यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर त्याने अजय यांच्यावरही हल्ला केला.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त अमित काळे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला रक्ताने माखलेला चाकू हस्तगत केला असून, भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.