

सुवर्णा दिवेकर
अलिबाग : पावसाळा म्हटला की रायगड जिल्ह्यासमोर पूर, भूस्खलन, अतिवृष्टी आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे आव्हान उभे राहते. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रायगड जिल्हा प्रशासनाने राज्यात प्रथमच एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे २४० संभाव्य दरडग्रस्त व पूरप्रवण गावांमध्ये अत्याधुनिक आपत्ती उद्घोषणा प्रणाली उभारण्याचे काम वेगाने सुरू असून, यामुळे आपत्तीपूर्व सूचना थेट गावकऱ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या उपक्रमामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि गतिमान होणार आहे. गावांमधील महत्त्वाच्या चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या उद्घोषणा प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट सूचना, इशारे आणि सतर्कतेचे संदेश प्रसारित करता येणार आहेत. त्यामुळे आपत्तीच्या काळात वेळेवर माहिती मिळून नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे सुलभ होणार आहे.
महाड आणि पोलादपूर तालुक्यातील वर्ग १ व २ मधील दरडग्रस्त गावांमध्ये या प्रणालीला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच महाड, रोहा, नागोठणे आणि खोपोली या पूरप्रवण शहरांमध्येही ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. परिणामी पूरस्थिती, पाण्याची पातळी किंवा अन्य धोक्यांबाबत तात्काळ इशारे देणे शक्य होणार आहे.
यासोबतच पूरप्रवण गावांसाठी जीएसएम तंत्रज्ञानावर आधारित स्वतंत्र टू-वे कम्युनिकेशन सिस्टीम विकसित करण्यात आली आहे. आय-ट्रिपल ई ह्युमेनिटेरियन टेक्नॉलॉजी बोर्ड आणि पुण्यातील माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली ही प्रणाली गाव आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद प्रस्थापित करणार आहे. आपत्तीच्या काळात संपर्क व्यवस्था खंडित झाल्यासही महत्त्वाची माहिती देवाणघेवाण करण्यास याचा मोठा फायदा होणार आहे.
आपत्तीच्या काळात संपर्क यंत्रणा कार्यरत राहणे हीच जीवित आणि वित्तहानी कमी करण्याची गुरुकिल्ली असते. ही बाब ओळखून जिल्हा प्रशासनाने उभारलेली उद्घोषणा प्रणाली भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावागावांपर्यंत इशारे पोहोचल्याने नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळणार असून रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात राज्यासाठी आदर्श ठरणार आहे.
"आपत्तीकाळात संपर्क यंत्रणा कार्यरत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही आधुनिक आपत्ती व्यवस्थापन उद्घोषणा प्रणाली विकसित केली आहे. यामुळे सूचना आणि इशारे थेट गावागावांत पोहोचविणे शक्य होणार असून, राज्यात प्रथमच अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे."
- किशन जावळे, जिल्हाधिकारी रायगड