

खाडीपट्टा (रायगड) : रघुनाथ भागवत
गणेशोत्सव म्हटला की आनंदाला उधाण येतेच, मग कोकणी माणूस त्या आनंदाला आणखी द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत असतो. सद्या गणेशोत्सवामध्ये तरुणाई रिल्स बनवण्यामध्ये मग्न झालेली पाहायला मिळत आहे. त्यामध्ये विशेष करून माझ्या डोईवर भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नको, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या रिल्सना मोठी पसंती मिळत आहे.
खाडीपट्टयात सध्या गणेशोत्सवाची जोरदार धामधूम सुरू असून जागरणासाठी बाल्या डान्स सह पारंपारिक गीतांनी संपूर्ण वातावरण सण उत्सवाचे चैतन्यमय निर्मिती झालेली पाहायला मिळत आहे. बाल्या नृत्यासह पारंपारिक गीतांनी त्यात विशेष भर पडलेल्या इन्स्टा सह युट्युब वरील कित्येक रिल्सच्या माध्यमातून घराघरातील अंगणासह सभा मंडपामध्ये तरुणाई सह वयोवृद्ध देखील ठेका धरत आहेत. यामध्ये सर्वात उंचांक गाठलेले रिल्स माझ्या डोईवर भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नको या गवळणसह, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण हे गजर, तसेच जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीमुळे गळा हार वाहून या ही पुष्प फुलेहे सुपरहिट ठरलेले गाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेल्या या रिल्सचा मोठा गाजावाजा ऐकायला मिळत आहे. यासह सुपली सोन्याची सुपली सोन्याची या भोंडल्याची गाणी रिल्सला देखील विशेष महिला वर्गाकडून भाव मिळत आहे.
कुणी डोक्यावर ढोलकी घेऊन, तर कोणी पाणी बॉटल हातामध्ये घेऊन किंवा घरातील कोणतेही साहित्य ज्यामध्ये पातेले, टफ, बादली हातामध्ये घेऊन नाचवताना रिल्स बनवून आनंद द्विगुणित करत आहेत.खाडीपट्टयामध्ये इंटरनेटची वानवा असताना देखील ब्लूटूथ स्पीकरच्या माध्यमातून रिल्स बनवून त्या नेटवर्क उपलब्ध होत असलेल्या विशेष जागी जाऊन अपलोड केल्या जात आहेत. काळानुरूप विज्ञानाने केलेल्या प्रगतीमध्ये अत्यंत गरजेचा बनलेला मोबाईल हा अगदीच जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. मोबाईलच्या माध्यमातून व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टा, यूट्यूबवर नवनवीन पाहायला मिळणार्या रिल्स आपल्याला सुद्धा करता येऊ शकतील याचा प्रयत्न आता गावोगावी पाहायला मिळत असून सत्वर अशा महाराष्ट्रभर गाजलेल्या रील्सना विशेष प्राधान्य देऊन जागरणाला रिल्स बनवून आनंद द्विगुणीत केला जात आहे.
गणेशोत्सव दीड दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशी पर्यंत असून त्यामध्ये सर्वात जास्त सात दिवसांच्या गणेशोत्सवाला गावोगावी विशेष प्राधान्य दिले जात आहे. यंदा सात दिवसांचा कालावधी मिळाल्यामुळे गणेश भक्तांमध्ये अधिक उत्साह संचारलेला पाहायला मिळत आहे. या दरम्यान जागरणाला विशेष महत्व दिले जात असून बाळ्या डान्ससह पारंपारिक गीतांनी भोवती फेर धरून ढोलकीच्या तालावर सुमधुर चाली मध्ये गाणी गायिली जात आहेत. यामध्ये विशेष आकर्षण सध्या ठरत आहे ते इन्स्टा सोशलसह अन्य साइट्सवर उपलब्ध होणार्या आणि सार्या महाराष्ट्राला वेड लावणार्या रिल्सने गाजावाजा केला आहे. त्यामध्ये तरुणाईसह वयोवृद्ध महिला, पुरुष देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचे गावोगावी चित्र पाहायला मिळत आहे.