

रेवदंडा ः रेवदंडा बाजारपेठेतील नित्याच्या वाहतुक कोंडीने ग्रामस्थ व प्रवासीवर्ग त्रस्त झाले असून अजवड वाहतुक ही रेवदंडा बायपास मार्गे वळवावी अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासीवर्ग करत आहेत. ही वाहतूक वळविल्यास वाहतूक कोंडी आपोआप सुटेल,असा दावा केला जात आहे.
बाजारपेठतील रस्ता अरूंद असल्याने दोन अवजड वाहने पास होत असताना, वाहन चालकांना जिकीरीचे असते, शिवाय मुरूड पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिध्दीस आल्याने रेवदंडा बाजारपेठेतील वाहतुकीत वाढ झाली आहे. रेवदंडा बाजारपेठेत मुरूड व अलिबाग कडे जा-ये करणार्या लहान मोठया वाहनांची संख्या वाढली असून मिनिटागणीत वाहतुक येथून सुरू असते.
रेवदंडा बाजारपेठेत रस्ता रूंदीकरण करणे गरजेचे आहे, मात्र रेवदंडा बायपास रस्ता सुरळीत असल्याने चौलनाका येथून तसेच रेवदंडा मोठे बंदर येथून अवजड वाहने या मार्गी वळवावी अशी मागणी प्रवासीवर्ग तसेच ग्रामस्थ करीत आहेत.
रेवदंडा बाजारपेठेतील रस्ता अरूंद व काही ठिकाणी वळणाचा असल्याने नित्याने वाहतुक कोंडी येथे होते. रेवदंडा बाजारपेठेत अरूंद रस्ताने दोन अवजड वाहने पास होताना, फारच त्रासदायक असते. शिवाय नव्याने प्रवास करत असलेल्या वाहनचालकाला रस्ताची पुर्ण माहिती नसल्याने, दोन वाहने पास होताना खुप गडबड उडते, परिणामी अवजड वाहने पास होताना, अवजड वाहनाच्या मागेपूढे वाहनाची लाईन लागून वाहतुक कोंडी निर्माण होते.