रायगड : गेली दहा दिवस उत्साहात सुरु असलेल्या गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. या मिरवणुकीचे वेध रायगडवासियांना लागले असले तरी विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करून लावण्यात येणार्या डिजेच्या दणदणाटाचा धस्का सर्वसामान्य नागरिकांनी घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीत हा दणदणाट कमी केला जावा अशी मागणी करणारे फलक अलिबागसह जिल्हयात ठिकठिकाणी लावण्यात आल्याने पोलीस याबाबत काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
रायगड जिल्हयात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु झाला आहे. जिल्ह्यात सुमारे एक लाख 60 हजार गणेशमूर्तींची यावेळी प्रतिष्ठापना झाली होती. गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तर 8 सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या तर 12 सप्टेंबर रोजी गौरी गणपतींचे विसर्जन उत्साहात पार पडले. गणपती बाप्पाच्या आगमना वेळी असणार्या उत्साहाप्रमाणे विसर्जन मिरवणुकांमध्येही गणेशभक्तांंमध्ये मोठा उत्साह दिसून आला. रायगड जिल्ह्यात गाव, गल्लीपासून ठिकठिकाणच्या गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. काही गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्य, पारंपरिक भजनांच्या भक्तीमय वातावरण निघाल्या होत्या. मात्र काही गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिक्षेपकावर मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवून नाचगाणी सुरु होती. काही ठिकाणी डिजे साऊंड सिस्टीम सारखी वाद्य अति आवाजात वाजविली जात होती.
या विसर्जन मिरवणुकांमधील मोठमोठ्या आवाजाने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील दीड दिवसाच्या आणि गौरी गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांमुळे सर्वसामान् नागरिकांनी त्रास सहन केला आहे.
येत्या 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. यावेळीही विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजाने डीजेवरील दणदणाट होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी आता याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डिजेच्या तीव्र आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण यांना त्रास होत असल्याने गणेशभक्त, सार्वजनिक गणेशमंडळांनी विसर्जन मिरवणूकांमध्ये स्पिकर-डिजे साऊंड सिस्टीमचा मोठा आवाज टाळावा, अशी मागणी केली आहे. याबाबत अलिबाग शहरात आवाहनाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस येत्या अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना करतात, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी पोलिसांकडून गणेशमंडळांना सूचना केल्या जातात मात्र त्या पाळल्या जात नसल्याचे दिसते.