

आनंद सकपाळ
नेरळ: नेरळ, ममदापूर व कोल्हारे या ग्रामपंचायती नेरळ विकास संकुल प्राधिकरण क्षेत्रात येत असल्याने या परिसरात झपाट्याने शहरीकरण वाढत आहे. मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहत असून नागरी वस्तीही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच आगीसारख्या आपत्कालीन घटनांवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणेची गरज निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांकडून अनेक वर्षांपासून नेरळमध्ये स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जुन्या डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर हे केंद्र उभारावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नेरळ, ममदापूर व कोल्हारे या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प पूर्ण झाले असून अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यामुळे हा परिसर मुंबईच्या उपनगरांप्रमाणे वेगाने विकसित होत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे आग लागल्यास तातडीची अग्निशमन सेवा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
सध्या या परिसरात आग लागल्यास माथेरान गिरीस्थान नगरपरिषद, कर्जत नगर परिषद किंवा खोपोली नगर परिषद यांच्या अग्निशमन विभागाची मदत घ्यावी लागते. मात्र माथेरानची अग्निशमन गाडी अनेकदा बंद अवस्थेत असल्याचे सांगितले जाते. खोपोली येथून गाडी येण्यास विलंब होतो, तर कर्जत शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे तेथील अग्निशमन विभागावरही मोठा ताण पडत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वेळेत मदत मिळण्यात अडचणी येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
याच पार्श्वभूमीवर कर्जत-कल्याण राज्य मार्गालगत असलेल्या जुन्या डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण किंवा नेरळ विकास प्राधिकरणामार्फत अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र वर्षानुवर्षे मागणी करूनही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
“नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील कल्याण-कर्जत महामार्ग क्रमांक 76 लगत असलेल्या जुन्या डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर 2015 साली अग्निशमन दल केंद्र उभारण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला होता. दहा-बारा वर्षे उलटून गेली तरी अत्यावश्यक असलेली ही सुविधा अद्याप सुरू झालेली नाही. विकासकामांचे दावे केले जात आहेत; मात्र नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या कामाकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. सर्वप्रथम येथे अग्निशमन केंद्र उभारले पाहिजे, त्यानंतर इतर विकासकामे झाली तरी हरकत नाही,”
- गोरख शेप, सामाजिक व आर टी आय कार्यकर्ते, नेरळ