उरण : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारने 1 जून ते 31 जुलै 2024 या दोन महिन्यांसाठी खोल समुद्रातील मासेमारीसाठी बंदीचे आदेश लागू केले आहेत. असे असतानाही आदेशाचे उल्लंघन करून उरण, मुंबई, रायगड समुद्र परिसरातील ठिकठिकाणी अवैधरित्या मासेमारी करणार्या 21 मासेमारी बोटींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी प्रियांका भोई यांनी दिली.
ज्या बोटींनी नियमांचे उल्लंघन केले आहे अशा 21 बोटींवर मत्स्य विभागाच्यावतीने फौजदारी गुन्हे दाखल करुन त्या बोटींच्या मालकांवर प्रत्येकी 1 लाख 20 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.तशी तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे, जून आणि जुलै हे दोन महिने माशांच्या प्रजननासाठी महत्त्वाचे असतात. . असे असतानाही बंदीचे आदेश झुगारून शेकडो मच्छीमार बोटी मुंबई, रायगड परिसरातील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करीत आहेत. उरण तालुक्यातील करंजा टर्मिनल्स, वशेणी पूल आणि खोपटा येथील खाडीत रिलायन्स जेट्टीवर अवैधरित्या अनेक मच्छीमार मासळीची विक्री करीत आहेत. व्यापारी, दलाल मोठ्या संख्येने येत आहेत.
उरण तालुक्यातील करंजा येथे मत्स्य विभाग आणि पोलिसांचा पहारा असल्यामुळे अवैधपणे मासेमारी करून आलेल्या बोटी समुद्रात थांबवतात आणि तिथून ते लहान बोटीतून ही मच्छी किनार्यावर आणतात आणि नंतर गुपूचूप त्याची विक्री केली जाते. काही वेळेस मत्स्य विभागाच्या नकळत या बोटी दिघोडे, मोरावा, उलवा, तरघर, केळवणे, वशेणी, खोपटे या ठिकाणी लावतात आणि ती व्यापार्यांना विकण्यात येते.