

रोहे : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी एप्रिल २०२६ महिन्यात रु. १६.१३ कोटी इतके तिकीट तपासणी उत्पन्न नोंदवत मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. हा मासिक उत्पन्नाचा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा असून मे २०२३ मध्ये नोंदविण्यात आलेल्या रु. १४.५० कोटींच्या आधीच्या विक्रमापेक्षा अधिक आहे.
एप्रिल २०२६ दरम्यान मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी मेल व एक्सप्रेस तसेच उपनगरी गाड्यांमध्ये (एसी लोकलसह) अनियमित प्रवासाच्या २.२७ लाख प्रकरणांचा शोध घेऊन दंड आकारला, तर एप्रिल २०२५ मध्ये ही संख्या १.४५ लाख होती, म्हणजेच ५६% वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल २०२६ मध्ये रु. १६.१३ कोटी इतका दंड वसूल करण्यात आला, तर एप्रिल २०२५ मध्ये रु. ६.०७ कोटी दंड वसूल करण्यात आला होता, म्हणजेच १६६% इतकी लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.
मेल व एक्सप्रेस तसेच उपनगरी गाड्यांमध्ये, विशेषतः द्वितीय श्रेणी डब्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्यामुळे एप्रिल २०२६ मध्ये १.५८ लाख प्रकरणे आढळली, तर एप्रिल २०२५ मध्ये ही संख्या १.०५ लाख होती, म्हणजेच ५०% वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल २०२६ मध्ये रु. १३.०६ कोटी दंड वसूल करण्यात आला, तर एप्रिल २०२५ मध्ये रु. ५.०३ कोटी दंड वसूल करण्यात आला होता, म्हणजेच १६०% वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल २०२६ दरम्यान एसी लोकलमध्ये अनियमित प्रवास रोखण्यासाठी व प्रामाणिक प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या असून त्यातून उत्तम निष्कर्ष मिळाले आहेत. एप्रिल २०२६ मध्ये एसी लोकलमध्ये १२,६९८ प्रकरणे आढळली, तर एप्रिल २०२५ मध्ये १०,४२० प्रकरणे होती, म्हणजेच २२% वाढ नोंदविण्यात आली आहे.
दंड वसुली एप्रिल २०२६ मध्ये रु. ३९.६६ लाख इतकी झाली, तर एप्रिल २०२५ मध्ये रु. ३४.३९ लाख होती, म्हणजेच १५% वाढ नोंदविण्यात आली आहे. इतर श्रेणींमधील अनियमित प्रवास व विनातिकिट (unbooked) सामानासंबंधी प्रकरणे व दंड वसुली (एप्रिल २०२६) प्रथम श्रेणी मध्ये ११,८७७ प्रकरणे व रु. ३.७९ कोटी दंड, मेल व एक्सप्रेस गाड्यांतील भाडे फरक ३५,७८५ प्रकरणे व रु. २.२० कोटी दंड, विनातिकिट (unbooked) सामानासंबंधी ८,७२३ प्रकरणे व रु. ९.९५ लाख दंड एवढा आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे मेल व एक्सप्रेस तसेच उपनगरी गाड्यांमध्ये (एसी व नॉन एसी लोकल) तसेच स्थानकांवर नियमित विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात येतात, ज्यामुळे अनियमित प्रवासावर आळा बसतो तसेच प्रामाणिक प्रवाशांच्या सुरक्षिततेत व सोयीमध्ये वाढ होते. या मोहिमांमुळे केवळ नियमभंग करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई होत नाही, तर विनातिकीट प्रवासाला आळा बसण्यासही मदत होते.
मध्य रेल्वे द्वारे प्रवाशांना आवाहन करण्यात येते की त्यांनी योग्य व वैध तिकीट खरेदी करून जबाबदारीने व सन्मानाने प्रवास करावा, ज्यामुळे गैरसोय व दंड टाळता येईल. रेल्वे प्रशासन विनातिकीट प्रवासाबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण कायम ठेवत असून प्रवाशांना सुरक्षित, सन्मानपूर्वक व सोयीस्कर प्रवास देण्यासाठी कटिबद्ध आहे.