

उरण : उरण तालुक्यातील बोरी गावामध्ये मोबाईल टॉवर उभारणीला जोरदार विरोध होत असून स्थानिक रहिवाशांनी आरोग्याला होणार्या संभाव्य धोक्याचा मुद्दा पुढे करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
भर वस्तीमध्ये उभारला जाणारा हा मोबाईल टॉवर नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करू शकतो, असा दावा करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, टॉवरमधून उत्सर्जित होणारे किरणोत्सर्ग हे दीर्घकाळ आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध नागरिक यांच्यावर त्याचा विशेषतः वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या टॉवरच्या उभारणीला गावकर्यांनी ठाम विरोध दर्शविला आहे.
या संदर्भात नागरिकांनी उरण नगरपरिषद, उरण पोलीस ठाणे तसेच तहसील कार्यालय यांच्याकडे तक्रारी करून टॉवर बंद करण्याची मागणी केली होती. मात्र अनेक दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गावकरी स्पष्टपणे सांगत आहेत की, आमच्या आरोग्याशी खेळ करायला आम्ही परवानगी देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत हा टॉवर कार्यरत होऊ देणार नाही, असा ग्रामस्थाचा पवित्रा आहे.