

महाड ः बिरवाडी आणि खरवली गावाला जोडणारा बहुप्रतिक्षित पूल अखेर पूर्ण झाला असून 8 मे रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले. जि. प. सदस्य विकास गोगावले यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. 2021 च्या महापुरात पूल वाहून गेल्याने वरंध आणि बिरवाडी विभागातील नागरिकांची गैरसोय होत होती. आता नव्याने बांधलेल्या पुलामुळे दोन्ही विभागांतील दळणवळण सुरळीत होणार आहे.
पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बिरवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून,जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुरात बिरवाडी-खरवलीला जोडणारा जुना पूल पूर्णपणे बाधित झाला होता. त्यामुळे शाळकरी मुले, शेतकरी, व्यापारी आणि रुग्णांना पर्यायी लांबच्या मार्गाचा वापर करावा लागत होता. पावसाळ्यात तर गावांचा संपर्कच तुटायचा.
पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ना. मंत्री भरत गोगावले यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे या पुलाला मंजुरी मिळाली आणि निधी उपलब्ध झाला. वेळेत काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली सदर पुलाच्या बांधकामाचे कंत्राट राजेवाडी येथील अरबाज लंबाडे यांच्या कंपनीला देण्यात आले होते.
कंपनीने दिलेल्या वेळेत दर्जेदार काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला केला. वरंध विभाग आणि बिरवाडी विभागाला जोडणारा हा पूल आता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
उद्घाटनाला प्रमुख उपस्थिती: शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य तथा सचिव, युवासेना रा.जि.संपर्कप्रमुख आणि रा.जि.परिषद सदस्य विकास शेठ गोगावले यांनी फीत कापून पूलाचे उद्घाटन केले. इतर मान्यवर व्यक्तीमध्ये काळीज खरवली ग्रा.पं.चे सरपंच चैतन्य उर्फ बाबू महामुनकर, जि. प. सदस्य मनाली काळीजकर, शिवसेना शेतकरी कामगार सेना जिल्हाध्यक्ष विजय आप्पा सावंत, उपजिल्हाप्रमुख तथा महाड पं. स. उपसभापती सुरेश महाडिक, शिवसेना संघटक समीर अण्णा महामुनकर, माजी जि.प.सदस्य मनोज काळीजकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख लक्ष्मण भोसले, विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
विशेषतः पावसाळ्यात होणारी गैरसोय आता कायमची दूर होणार असल्याने ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावले आणि विकास गोगावले यांचे आभार मानले. हा पूल वरंध खोऱ्यातील दळणवळणासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार असून परिसराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.