

महाड: पालकमंत्री पद मिळविल्यानंतर शिवसेनेचे महाडचे आमदार भरत शेठ गोगावले आता रायगडच्या जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाच दशकांच्या राजकीय घडामोडींनंतर आणि पावणेदोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेली ही नवी जबाबदारी ते सर्व घटकांना सोबत घेऊन कर्तव्यपूर्तीच्या भावनेने निभावणार आहेत.पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी उचललेली पहिली पावले अत्यंत अर्थपूर्ण आहेत.
निरूपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट, दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन, पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होणे आणि बंगळुरू येथे श्री श्री रविशंकर यांचे आशीर्वाद घेणे; या सर्व घडामोडींमधून त्यांनी आपल्या आगामी राजकीय व सामाजिक कार्याचे अधिष्ठान स्पष्ट केले आहे.
भरत शेठ गोगावले यांचा मतदारसंघ असलेल्या महाड परिसराला मोठा ऐतिहासिक, सामाजिक व अध्यात्मिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य व लोककल्याणाचा विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे सत्याग्रहातून दिलेला सामाजिक समतेचा संदेश, समर्थ रामदासांनी शिवथर घळीत रचलेला दासबोध आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ भूमीतील पराक्रम या चारही विचारधारांचे अधिष्ठान या भूमीला आहे.
या चार प्रेरणास्थानांचा संगम असलेल्या भूमीचे प्रतिनिधित्व करत असल्याने, स्वतःला ‘छत्रपतींचा मावळा’ म्हणवणाऱ्या गोगावले यांच्यासाठी हे पद केवळ सत्ता नसून इतिहासाने खांद्यावर दिलेली मोठी जबाबदारी आहे.
मावळा असणे म्हणजे केवळ घोषणा न देता जनतेच्या प्रश्नांसाठी उभे राहणे आणि विकासकामांना गती देणे होय.आज रायगड जिल्ह्यासमोर ऐतिहासिक वारसा संवर्धन, पर्यटनाला चालना, दुर्ग व तीर्थक्षेत्र विकास, औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा, रोजगारनिर्मिती, तसेच ग्रामीण भागातील रस्ते, पाणी व आरोग्याचे प्रश्न यांसारखी अनेक आव्हाने आहेत.
या सर्वांवर मात करत सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिकांना सोबत घेऊन जिल्ह्याचा समतोल विकास साधणे आणि जनतेचा प्रत्यक्ष विश्वास जिंकणे, हीच खरी कसोटी ठरणार आहे.