

महाड ः किल्ले रायगड आणि चवदारतळ्याच्या विकासासाठी शासनाने किमान 1000 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा बौद्धजन पंचायत समिती सभापती आनंदराज आंबेडकर यांनी केली.
चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त बौद्धजन पंचायत समितीची जाहीर सभा महाड येथील क्रांतिभूमीवर आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते. आजच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीवर भाष्य करताना देशाच्या भल्यासाठी बाबासाहेबांचा विचार आणि जगाच्या शांततेसाठी गौतम बुद्धांची शिकवण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराज आंबेडकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हर्षदीप कांबळे आणि दिनेश डिंगळे उपस्थित होते. विनोद मोरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मण भगत यांच्या प्रास्ताविकाने झाली. सूत्रसंचालन राजेश घाडगे यांनी केले, तर राहुल साळवी यांनी स्वागत केले. शशिकांत खैरे यांनी आभार प्रदर्शन केले. वक्त्यांनी किल्ले रायगडप्रमाणेच चवदारतळ्याच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची तसेच प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी आनंदराज आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात यावी अशी अशी मागणीही केली.
तसेच क्रांती स्तंभ येथील अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात ही बौद्धजन पंचायत समिती मार्फतच करण्यात आल्याने पुढील वर्षी होणाऱ्या शंभराव्या वर्धापन दिन सोहळ्या वेळी हा कार्यक्रम आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचा खर्च
कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, मात्र ज्या चवदारतळ्याने जगाला समतेचा संदेश दिला त्या ठिकाणासाठी तुटपुंजा निधी दिला जातो, हे योग्य नाही. महाड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक सत्याग्रहाची भूमी असल्याने या दोन्ही ठिकाणांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देणे आवश्यक असल्याचे आंबेडकर यांनी सुचित केले.