रायगड, पुढारी वृत्तसेवा : केदारनाथ येथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चारधाम परिसरात प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे दर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातून 110 यात्रेकरू चारधामला गेले आहेत. या ठिकाणी जारी केलेल्या अलर्टमुळे भाविकांनी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
केदारनाथ यात्रेमधील महाडच्या 10 पैकी 5 यात्रेकरूंचे दिल्लीकडे प्रस्थान करण्यात आले आहे. यामधील तिघे हरिद्वार तर दोघे केदारनाथ येथे सुरक्षित आहेत. महाड तालुक्यातील दहा यात्रेकरू सुरक्षित असल्याची माहिती यामधील एका यात्रेकरूने प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीद्वारे बोलताना दिली आहे.केदारनाथवरुन दिल्लीकडे प्रस्थान केलेल्या भाविकांना मुंबईकडे येण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. सुदाम मोरे, प्रदीप मोरे, ज्ञानेश्वर चौधरी, राजेश मोरे, आणि नितीन सकपाळ अशी या भाविकांची नावे आहेत. तर हरिद्वार येथे असणारे भाविक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.
महाडमधून (दि.29) जुलैमधून केदारनाथकडे रवाना झालेल्या यात्रेकरु केदारनाथ कॅम्पकडे जात असताना या ठिकाणी शासनाने रेड अलर्ट घोषित केला. ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळत असल्याची माहिती देऊन केदारनाथ येथील दोन सहकारी देखील सुरक्षित असल्याचे सांगितले. मात्र, त्या ठिकाणी संपर्क होत नसल्याची माहिती दिली आहे. घरातील नातेवाईकांबरोबर संपर्क होऊन त्यांना सर्व माहिती दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.