

रायगड ः जयंत धुळप
अलिबाग रोहा राज्य मार्गावरील सहा पूल धोकादायक झाल्याने या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढले आणि अलिबाग-रोहा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.
परिणामी अलिबाग व रोहा या दोन महत्वाच्या शहरांदरम्याची एसटी सेवा देखील बंद झाली असून, प्रवाशांचे हाल सुरु झाले तर अलिबाग एसटी आगाराच्या दैनंदीन 15 एसटी फेऱ्या बंद झाल्याने दररोज 45 हजार रुपयांचा तोटा एसटीला सोसावा लागत असून आता पर्यंत अलिबाग एसटी आगाराचा हा एकुण आर्थिक तोटी 13 लाख 50 हजार रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
प्रवाशाच्या पर्यायी सेवेची प्रशासनानेही केली नाही व्यवस्था
अलिबाग सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील अलिबाग-रोहा राज्या मार्ग क्र.91 वरिल वलवली-वढाव या गावा दरम्यानचा वढाव येथील पूल गेल्या 3 नोव्हेंबर 2025 रोजी पावसात कोसळला आणि या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
दरम्यान या पूला व्यतिरिक्त याच अलिबाग-रोहा मार्गावरील 5 टन वहन क्षमतेचे रामराज, सुडकोली येथील दोन, नवेदरबेली, देहेन या पूलांसह सहाण-पाल्हे हा 16 टन वहन क्षमतेचा पूल धोकादायक झाला असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहतूक वाहन वाहतूक बंदीचे आदेश अमलात आणले परंतू या मार्गावरील दैनंदिन प्रवाश्याकरिता पर्यायी सोय काय वा पर्यायी मार्ग कोणते याची व्यवस्था मात्र जिल्हा प्रशासन वा सार्वजनीक बांधकाम विभागाने केलेली नाही.
याच मार्गावरील वढाव येथील पूल गेल्या 3 नोव्हेंबर 2025 पडल्याने उसर येथील येथील गेल-इंडीया कंपनीच्या नव्या प्रकल्पाची परदेशी मशिनरी घेवून येणारी अवजड वाहने पनवेल ते अलिबाग दरम्यान रस्त्यावरच अडकून पडली असल्याचे दैनिक पूढीरी ने सर्वासमोर आणल्यावर, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपूराव्यांतू तत्काळ 15 कोटी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी‘ असे ब्रीदवाक्य घेवून प्रवाशांना दैनंदिन प्रवासी सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाला गेल्या 3 नोव्हेंबर 2025 पासून आपल्या अलिबाग ते रोहा दरम्यानच्या प्रवाशांना अलिबाग सार्वजनीक बांधकांम विभागाच्या सुस्त कारभारामुळे प्रवासी सेवा देवू शकत नसल्याने हजारो प्रवाशांच्या वाट्याला हाल आले आहेत. अलिबाग नागोठणे मार्गे रोही अशी दोन एसटी बसेस अलिबाग एसटी आगाराने सुरु केल्या आहेत, मात्र अधिक वेळ आणि अधिक प्रवासी तीकीट देवून प्रवाशांना हा प्रवास करावा लागत असल्याने प्रवासीवर्गात मोठ्या संतापाची लाट आहे.