

रायगड : नागरिकांच्या आशा-आकांक्षांचा विचार करून विकासप्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग, दूरदृष्टी ठेवून योग्य नियोजन, जगातील अत्याधुनिक संकल्पना तंत्रज्ञानाचा वापर, उत्पन्नाच्या स्रोतात वाढ आणि विकास प्रकल्पांच्या गतीने पूर्णत्वासाठीचा पाठपुरावा या माध्यमातून भविष्यातील 'विकसित रायगड जिल्हा साकारला जाईल यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करु या असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आदिती तटकरे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर, शहीद यांना वंदन केले.
महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या एकमेव अजेंड्यावर राज्य शासन काम करत आहे. राज्याला देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावर नेण्यासाठी आम्ही आगामी पाच वर्षांसाठी एक ठोस आणि सर्वसमावेशक व्हिजन निश्चित केले आहे. आज आपण ज्या संधी आणि आव्हानांसमोर उभे आहोत, त्यावर मात करत एक स्थिर, समृद्ध, आणि लोकाभिमुख महाराष्ट्र घडवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
विकासाच्या बाबतीत जागतिक पातळीवरीत संकल्पना आता बदलत चालल्या आहेत, निव्वळ आर्थिक विकास म्हणजे विकास नव्हे, तर बदललेल्या संकल्पनेत आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्याच्या सोयीसुविधा, रोजगार निर्मिती, ग्रामीण रस्ते, महामार्ग, रेल्वे मार्ग, मेट्रो, विमानतळ, जलमार्ग यांसारख्या सुविधांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी दिला जाणारा निधी हा केवळ खर्च नसून ती भविष्यासाठी केलेली गुंतवणूक बनली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने सन 2025-26 पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.राज्य शासन व टाटा समूह उद्योग यांच्यावतीने रोहा येथे कौशल्यवर्धन केंद्र शिक्षणाचे नवे दालन उभारण्यात येत आहे. हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून मे 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
विविध पुरस्काराचे वितरण
यावेळी मंत्री कु तटकरे यांच्या हस्ते अवयव दात्यांचा,१०० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम दुसरा टप्पा निवड झालेल्या कार्यालयाना,पूर्व उच्च प्राथमिक ५वी व पूर्व माध्यमिक ८ वी शिष्यवृत्तीपरिक्षा २०२५ प्रमाणपत्र, सैनिक नायक पदक (ताम्रपटांचे वितरण) २०२५, नगरपरिषद आस्थापनेवरील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेशाचे, आपत्ती प्रसंगी सहकार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक आचल दलाल,उप वनसंरक्षक राहुल पाटीलअपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील, कार्यकारी अभियंता, सां.बा.अलिबाग मिनाक्षी धायतडक, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.