

रायगड : जयंत धुळप
भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या दिवशी गौरींचे आगमन होऊन अष्टमीच्या दिवशी पूजन होते. ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरी आहेत. मात्र मराठा आरमाराचे प्रमुख दर्यासारंग सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या घराण्यात मात्र केवळ जेष्ठा गौरींचे आगमन आणि पूजन होते. आंग्रे घराण्याची ही 300 वर्षांची प्राचीन परंपरा असून जेष्ठा गौरी पूजनाचे वैशिष्ठ्य असल्याची माहिती सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या आठव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी दैनिक ’पुढारी’शी बोलताना दिली आहे.
रघुजीराजे आंग्रे यांच्या येथील हिराकोट किल्ल्या जवळील घेरीया या निवासस्थानी परंपरेनुसार ज्येष्ठा गौरींचे आगमन झाले. आंग्रे घराण्याची प्रथा आणि परंपरा आजही अखंड सुरु असून, त्या परंपरेनुसार चालत आलेल्या सरखेल कोन्होजीराजे यांच्या काळातील देवीचा मुखवटा गेल्या आठ पिढ्यांपासून आजही तोच असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी पूढे सांगितले.
बुधवारी रघुजीराजे आंग्रे व त्यांच्या सुविद्यपत्नी भैरवी आंग्रे यांनी ज्येष्ठा गौरींचे परंपरेनुसार विधीवत पूजन केले. अत्यंत आकर्षक अशी आरास देखील गौरीपुजनाच्या निमीत्ताने करण्यात आली आहे. आपल्या रिती आणि परंपरा आपण आवर्जून पाळल्या पाहीजेत. त्या अबाधीत राखल्या पाहीजेत. जेणेकरुन त्या आपल्या पुढील पिढीला समजतील आणि त्यांच्या पिढीत देखील त्या पाळल्या जाऊन पिढीजात परंपरा अखंडीत पूढे सुरु राहातील. या हेतूने आंग्रे घराण्याच्या सर्व पिढ्यांपिढ्याच्या रिती, परंपरा आणि सण आम्ही साजरे करित आहोत, असेही रघुजीराजे आंग्रे यांनी आवर्जून सांगीतले.