Yashwant project begins important phase
सीताराम लांडगे
लोणी काळभोर: थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 99.27 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विकण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने कारखाना सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. काही महिन्यापूर्वी कारखान्याच्या संचालक मंडळाने सर्वसाधारण सभा घेऊन त्यामध्ये कारखान्याची ही जमीन विक्री करण्यासंदर्भात ठराव मंजूर करून घेतला होता.
सन 2011 मध्ये कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सुमार कामगिरीमुळे चालू स्थितीतील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. गेली 14 वर्षे ही अशीच परिस्थिती कायम राहिली. दरम्यान, मागील वर्षी या कारखान्यावर सभासद नियुक्त संचालक मंडळ कार्यरत झाले. या संचालक मंडळाने जमीन विक्रीचा निर्णय घेतल्याने 299 कोटी रुपये उपलब्ध होणारा असून, यातून सर्व देणे पूर्ण करून कारखाना पूर्ववत चालू करण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. (Latest Pune News)
आम्ही सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केलेली आहे. शिवाय कारखान्याची सर्व जमीन स्थावर जंगम मालमत्ता राज्य सहकारी बँकेच्या अधिकृतपणे ताब्यात आहे. कारखान्याचे संचालक मंडळाचा मनमानी कारभार, राज्य बँकेच्या तथाकथित कर्जाबाबत, साखर आयुक्त कार्यालयाची कर्तव्य कसुरी अशा विविध पातळीवर झालेल्या व होत असलेल्या बेकायदेशीर व गैरकारभाराबाबत विविध मुद्यांवर प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना राज्यमंत्री मंडळाने दिलेली मंजुरी अनाकलनीय आहे. यात मोठा आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता दिसत आहे. गरजेइतकी आणि जाहीर लिलाव पद्धतीने जमीन विक्री न करता मनमानी व्यवहार कुणाच्या हितासाठी होणार आहे, हे आम्ही येत्या काळात उघड करणार आहोत. बाजारभावापेक्षा कमी दराने कारखान्याची जमीन विक्री करण्याचा अधिकृतपणे भ्रष्टाचारी ठरलेल्या दोन भावांचा प्रयत्न आम्ही जागरूक सभासद शेतकरी यशस्वी होऊ देणार नाही. राज्य शासनाने भ्रष्ट कारभाराला खतपाणी घालू नये.
-विकास लवांडे, अध्यक्ष, यशवंत बचाव शेतकरी संघर्ष समिती