

पुणे: एकेकाळी घरातील जेवणाच्या वेळी रंगणाऱ्या गप्पा, अंगणात ऐकू येणारे हास्य, आजी-आजोबांच्या गोष्टी आणि सण-समारंभात अनुभवला जाणारा आपलेपणा... हे सारे चित्र आता हळूहळू मोबाईल, इंटरनेटच्या पडद्याआड हरवत चालल्याचे दिसत आहे.
ऑनलाईन जगात गुंतलेल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रत्यक्ष संवाद कमी होत असून, त्यामुळे भावनिक दुरावाही वाढत आहे. शुक्रवारी (दि. 15) असलेल्या जागतिक कुटुंब दिनानिमित्त मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केलेली ही चिंता आजच्या बदलत्या सामाजिक वास्तवावर बोट ठेवणारी आहे.
महाराष्ट्रात स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंग, ओटीटी व्यासपीठामुळे संवादाचे प्रमाण घटले आहे. किशोरवयीन मुले आणि 18 ते 50 वयोगटातील व्यक्ती ऑनलाइन माध्यमांच्या सर्वाधिक आहारी गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
कुटुंबातील संवाद वाढविण्यासाठी हे करा
रोज किमान एक तास कुटुंबासोबत वेळ घालवावा.
जेवणाच्या वेळी मोबाईलचा वापर टाळावा.
पालकांनी मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर द्यावा.
कुटुंबासोबत फिरणे, खेळ खेळणे किंवा वाचनाचे उपक्रम राबवावेत.
मुलांच्या सोशल मीडियावरील वापरावर नियंत्रण ठेवावे.
मी नोकरी करते. त्यामुळे हवा तसा वेळ माझ्या मुलींना देता येत नव्हता. त्यामुळे त्यांच्या हाती मोबाईल आला. पण, मुलींचा स्क्रीन टाइम वाढत असल्याचे आणि त्या आमच्याशी फारसे काही शेअर करत नसल्याचे लक्षात आले.
त्यानंतर मी आणि माझ्या पतीने त्यांचा स्क्रीन टाइम कमी करण्याचा निर्णय घेतला. जेवणाच्या वेळी प्रत्यक्ष संवाद, फिरायला जाणे, अभ्यासाविषयी विचारपूस, एकत्र खेळ खेळणे आणि गप्पा मारणे या गोष्टींना प्राधान्य दिले. त्यानंतर आमच्या कुटुंबातील संवाद वाढल्याचा सकारात्मक बदल जाणवला.
- नेहा आकीवाटे, पालक
घरात संवाद कमी झाल्यावर चिडचीड, मानसिक तणाव, एकटेपणा आणि गैरसमज वाढतात. विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडियामुळे तुलना आणि मानसिक दबाव वाढत आहे. त्यामुळे ‘नो मोबाईल आणि फॅमिली टाइम’ ही संकल्पना आता प्रत्येक घरात रुजवावी लागेल.
- प्रा. चेतन दिवाण, मानसोपचारतज्ज्ञ