गणेशोत्सव होऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिकचा काळ लोटला, तरीही अद्याप शासनाकडून जाहीर केलेला आनंदाचा शिधा नागरिकांना मिळाला नाही. यामुळे आता दिवाळीचा तरी आनंदाचा शिधा वेळेवर मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवून त्यांच्या खात्यात मासिक हप्ते वर्ग केले जात आहेत. मात्र, सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा वेळेवर मिळणार का? याबद्दल नागरिकांमध्ये साशंकता आहे. गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वाटप करण्यात आलेल्या शिध्यामधील वस्तूंमध्ये कपात करत शहरात केवळ 92 टक्केच आनंदाचा शिधा वाटप झाल्याचे समोर आले आहे.
शिंदे-फडणवीस यांचे महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर रेशन दुकानांवर आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात करण्यात आली. 100 रुपयांमध्ये चार पदार्थांचा समावेश असलेला शिधा देत असताना गेल्या वर्षी नव्याने मैदा आणि पोहे या वस्तूंची वाढ करण्यात आली होती.
सप्टेंबर महिन्यात गौरी गणपती सणानिमित्त महायुती सरकारने आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा केली. मात्र, या वेळी वाटप करताना आनंदाचा शिधामध्ये केवळ तेल, रवा, चणाडाळ आणि साखर एवढ्याच वस्तू देत पोहे, मैदा या वस्तूंची कपात करण्यात आली.
दरम्यान, पुरवठादारांकडून अपुर्या होणार्या वस्तूंचा पुरवठा, ऐन सणांच्या तोंडावर रेशन दुकानदारांकडून पुकारण्यात येणारे संप, ई-पॉस यंत्राच्या सर्व्हरवर ताण आल्याने कोलमडून पडलेली पुरवठा यंत्रणा, यामुळे आनंदाचा शिधा या योजनेला घरघर लागल्याचे शहरात झालेल्या शिधा आणि अन्नधान्य वाटपावरून स्पष्ट होत आहे.
गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे. त्यानुसार 11 परिमंडलातून 3 लाख 25 हजार शिधापत्रिकाधारकांमधून 92 टक्के शिधाचे वाटप करण्यात आले आहे. संप पुकारल्यामुळे आणि ई-पॉस यंत्रणेमुळे वाटपात अडथळे आले असून, उर्वरित शिधापत्रिकाधारकांना सप्टेंबर महिन्यातील आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल. यंदाच्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा वाटपाबाबत कुठलेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.
प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर