![Weather Update : राज्यात मान्सूनपूर्व पाऊस; या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2F15-9.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असून, 8 जूनपर्यंत राज्याच्या सर्वच भागांत जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार आहे. त्यातही ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहणार असून, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मंगळवारीदेखील मान्सूनपूर्व पावसाने राज्याच्या बहुतांश भागांत जोरदार हजेरी लावली आहे.
राज्याच्या सर्वच भागांत उष्णतेच्या लाटेमुळे उकाडा वाढला होता.
त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. याचबरोबर कोकणातील रायगड, मुंबई, पालघर या भागांत दमट तसेच उष्ण वातावरण होते. पूर्व-उत्तर प्रदेशापासून उत्तर कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पार करून कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. अर्थात, या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली असली, तरी प्रभाव कायम आहे. या स्थितीमुळे राज्यात मंगळवारपासून मान्सूनपूर्व पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे. हा पाऊस 8 जूनपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बरसणार आहे.
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ.
पोषक वातावरण आणि अनुकूल स्थितीमुळे केरळमध्ये पोहोचलेल्या मान्सूनने जोरदार आगेकूच केली आहे. मंगळवारी मान्सून गोव्यासह मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा काही भाग, तेलंगणा, रॉयलसीमाच्या काही भागात दाखाल झालेला आहे. दरम्यान, मान्सूनचा वेग पाहता पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण महाराष्ट्रासह मध्य अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्रप्रदेश, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिसा, बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व भाग तसेच ईशान्य भागात दाखल होणार आहे. दरम्यान, ईशान्य भारताकडे देखील मान्सूनची आगेकूच जोरदारसुरू आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या प्रगतीमध्ये पोषक वातावरण आणि अनुकूल स्थिती कारणीभूत आहे. त्यामुळे मान्सूनची प्रगती जोरदार होत आहे. सध्या बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व भाग व वायव्य भाग ते आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थिती आहे. ही स्थिती उत्तर तामिळनाडू किनारपट्टीपर्यंत कायम आहे. याबरोबरच केरळ ते दक्षिण तामिळनाडूनपर्यंत देखील चक्रीय स्थिती आहे. मध्य गुजरात ते दक्षिण गुजरातपर्यंत चक्रीय स्थिती आणि पूर्व उत्तर प्रदेशापासून उत्तर कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पार करून कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. अर्थात या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी झाली असली तरी प्रभाव कायम आहे. या स्थितीमुळे मान्सूनची घोडदौड सुरू आहे.
हेही वाचा