

पुणे : महासागरात भरपूर पाणी असले तरी ग्लोबल वॉर्मिंगमुळे ते प्रचंड तापत आहेत. त्यांचे वाढते तापमान हेच भारतीय मान्सूनसमोरील नवे आव्हान ठरत आहे. गत चार वर्षांत अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर मिळून एकूण १८ चक्रीवादळे आली. त्यामुळे मानवासह निसर्गाला त्याची किंमत मोजावी लागली.
सोमवारी, ८ जून रोजी जागतिक महासागर दिन जगात सर्वंत्र साजरा केला जाणार आहे. पृथ्वीच्या सुमारे ७१ टक्के पृष्ठभागावर महासागरांचे अस्तित्व असून ते जागतिक हवामान आणि जलचक्राचे प्रमुख नियंत्रक मानले जातात. भारतीय मान्सूनवर विशेषतः अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरातील समुद्रपृष्ठ तापत आहे. समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा जास्त झाल्यास बाष्पीभवन वाढते आणि वातावरणात अधिक आर्द्रता निर्माण होते. त्यामुळे काही भागांत अतिवृष्टीची शक्यता वाढते.
शास्त्रज्ञांची निरीक्षणे
अरबी समुद्र हिंदी महासागराच्या इतर भागांच्या तुलनेत अधिक वेगाने तापत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.
चक्रीवादळांची तीव्रता वाढणे, ढगफुटीसदृश पाऊस, मान्सूनमधील खंड यांसारख्या घटना अधिक वारंवार दिसत आहेत.
बंगालच्या उपसागरातील उष्ण पाणी कमी दाब क्षेत्रांना ऊर्जा पुरवते, ज्यामुळे मान्सूनच्या पावसाची तीव्रता वाढू शकते.
महासागरांचे तापमान वाढत राहिल्यास भारतीय मान्सून अधिक अनिश्चित होण्याची शक्यता आहे.
किनारी परिसंस्था संवर्धन, कार्बन उत्सर्जनात कपात आणि महासागरांच्या आरोग्याचे संरक्षण ही काळाची गरज बनली आहे.
जागतिक महासागर दिनानिमित्त महासागरांचे संरक्षण हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर भारताच्या मान्सून, अन्नसुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.