मुळशी प्रादेशिक योजनेतून पाणीपुरवठा होणार्या पौड ग्रामपंचायतीच्या थकीत पाणीपट्टीची पन्नास टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यामुळे पौड ग्रामपंचायतीची थकबाकीची रक्कम 88 लाख 75 हजार रुपयांनी कमी होणार आहे.
याबाबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. पौडचे माजी सरपंच प्रमोद शेलार यांनीही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत निवेदन दिले होते. जलशुद्धीकरण आणि महावितरणच्या वीजबिलाचा खर्च ग्रामपंचायतच करीत असतानाही अतिरिक्त वीजबिलाचा भुर्दंड ग्रामपंचायतीला सोसावा लागत होता. गावाला गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीपट्टीचा दरही हजारी 20 रुपयांवरून पाच रुपये करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पौड ग्रामपंचायतीची पाणीपट्टीच्या अवाजवी बिलापासून सुटका होणार आहे.
मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून गुरुत्वाकर्षण (ग्रॅव्हिटी) पद्धतीने पौड गावाजवळील टाकीत पाणी पुरवठा होतो. त्यानंतर ग्रामपंचायत गावासाठी आणि विठ्ठलवाडीसाठी दररोज नऊ लाख लिटरचा पाण्याचा उपसा करुन पाणीपुरवठा करते. यासाठी ग्रामपंचायतीने साठवण टाक्यांची सोय केली आहे. महावितरणचे वीजबिल आणि जलशुद्धीकरणाचा स्वतंत्र खर्च पौड ग्रामपंचायत करीत असताना प्रशासन ग्रामपंचायतीवर अतिरिक्त पाणीपट्टीची रक्कम लादत होते. विठ्ठलवाडीचाही याच ग्रामपंचायतीत समावेश होतो.
तसेच पौड गावात असलेल्या शासकीय कार्यालयांकडे पाणीपट्टीबाबत वारंवार पाठपुरावा करून त्यांच्याकडून पाणीपट्टी मिळत नाही. त्याचाही भुर्दंड पौड ग्रामपंचायतीलाच सोसावा लागतो. ऑगस्ट महिनाअखेर पौडची पाणीपट्टीची थकीत रक्कम सुमारे एक कोटी 41 लाख 70 हजार रुपयांपर्यंत पोचली होती. पाणीपट्टीचा अतिरिक्त भार कमी करावा त्याचप्रमाणे पाणीपट्टी हजारी पाच रुपयांप्रमाणे आकारण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली होती.
या निर्णयामुळे पौड ग्रामपंचायतीचा पाणीपट्टीचा ताण कमी झाला आहे. पाणीपट्टीचा दरही हजारी 20 रुपयांवरून पाच रुपये करण्यात आला आहे. यामुळे पाणीपट्टीची रक्कम जास्त वाढणार नाही.
अमित कंधारे, नियोजन समिती सदस्य