मंचर: भाजप पक्षामध्ये पक्षसंघटनेला फार महत्त्व आहे. गावपातळीवरील कार्यकर्ता हा भाजपचा महत्त्वाचा दुवा आणि ताकद आहे. पक्षसंघटना बांधणीला सर्वाधिक महत्त्व असल्यामुळे त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पदे देऊन काम करण्याची संधी दिली जाते. वशिला किंवा जवळचा म्हणून कोणालाही पद दिले जात नाही, याची नोंद कार्यकर्त्यांनी घेऊन पक्षसंघटना वाढीसाठी आपला वेळ द्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पडळकर यांनी केले.
आंबेगाव विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वामध्ये पक्षाने केलेल्या कामांचा आढावा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे घेण्यात आला, त्या वेळी पडळकर बोलत होते.
तालुकाध्यक्ष संदीप बाणखेले, जिल्हा सरचिटणीस डॉ. ताराचंद कराळे, जयसिंग एरंडे, श्रीकृष्ण देशमुख, संजय रौंदळ, शिरूर बेटचे अध्यक्ष मारुती शेळके, प्रमोद बाणखेले, राजेश काळे, स्वप्ना पिंगळे, अशोक गभाले, किरण पोखरकर, किरण वाळुंज, अरविंद वळसे पाटील, गणेश बाणखेले, योगेश बोर्हाडे इत्यादी पदाधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका करण्यात आल्या.