

पुणे : जेष्ठ लेखक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद करंदीकर यांचे मंगळवारी (दि.18) अल्पशा आजारानं निधन झालं. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात बहुविध योगदान देणाऱ्या करंदीकर यांच्या निधनाने बौद्धिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
तरुण वयातच त्यांनी युवक क्रांती दलाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. आयुष्यभर त्यांनी विविध सामाजिक संघटना, संस्था आणि चळवळींसोबत कार्य करत परिवर्तनवादी विचारांना चालना दिली. सुप्रसिद्ध साहित्यिक विंदा करंदीकर यांचे ते सुपुत्र होते.
लेखनक्षेत्रातही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. "माझ्या धडपडीचा कार्यनामा", "चळवळी यशस्वी का होतात" आणि "धोका" ही त्यांची महत्त्वाची पुस्तके वाचकांमध्ये लोकप्रिय ठरली. व्यवस्थापन आणि सल्लागार क्षेत्रातही त्यांनी 'एमईटीआरआयसी' या संस्थेचे अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलं.
विचारप्रवाह आणि वैचारिक संवाद वाढवण्यासाठी त्यांनी विचारवेध या वैचारिक चळवळीची स्थापना केली. त्यांच्या निधनाने सामाजिक, साहित्यिक आणि वैचारिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा आवाज थांबला असल्याची भावना विविध क्षेत्रांतून व्यक्त होत आहे.
उद्या (दि. १९) सकाळी १०.३० ते ११.३० च्या दरम्यान त्यांचा पार्थिव ससून हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक लॅब, पुणे मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांनंतर देहदान करण्यात येणार आहे.