

पुणे: हुंडाबळी हा समाजाला मोठा कलंक आहे. नऊ महिन्यांच्या बाळाची आई दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही. आरोपींवर कट-कारस्थान रचणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, पुरावे नष्ट करणे आणि आरोपींना लपविण्याचे गंभीर आरोप आहेत.
पीडितेच्या हक्कासोबत समाजहितही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे नमूद करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील तिघांचा जामीन अर्ज फेटाळला. वैष्णवीची सासू लता राजेंद्र हगवणे (वय 54), नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे (वय 21, दोघी रा. भुकूम, मुळशी) आणि नीलेश रामचंद्र चव्हाण (वय 35, रा. कर्वेनगर) अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. (Latest Pune News)
हुंड्यासाठी मानसिक-शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिची सासू, नणंद आणि नणंदेच्या मित्राने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार आणि तक्रारदारांचे वकील ॲड. शिवम निंबाळकर यांनी विरोध केला.
शवविच्छेदन अहवालात पीडितेच्या अंगावर तीस जखमा आढळून आल्या असून, 11 ते 16 मे दरम्यान तिचा सातत्याने क्रूर छळ केला जात होता. तिने सासरी आत्महत्या केली आहे. व्हॉट्सअप चॅटिंग, साक्षीदारांची साक्षही पीडितेचा सातत्याने छळ होत असल्याचे निदर्शनास आणतात. आरोपी नीलेश हुंड्याच्या प्रत्येक चर्चेवेळी उपस्थित होते, त्याने शशांक व करिश्माच्या मोबाइलमधील सीमकार्ड नष्ट केले आहेत.
कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारातून करिश्मा आणि नीलेशमधील निकटचे नाते लक्षात येते, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील व तक्रारदारांच्या वकिलांनी केला, तो ग््रााह्य धरत न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.
छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 24, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, मुळशी) हिने 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सर्व आरोपींविरोधात एकूण 1670 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.