

बावडा : उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येत असलेल्या पाण्यामध्ये सतत चढ-उतार होत आहे. सोमवारी (दि. 22) पहाटे 5.45 वाजता पाण्याचा विसर्ग वाढवून तो तब्बल 70 हजार क्युसेक करण्यात आला; मात्र नंतर 11.30 वाजता 50 हजार क्युसेक, तर पुन्हा दुपारी 1.30 वाजता कमी करून तो 30 हजार क्युसेक एवढा करण्यात आला. दरम्यान, रात्री 8.30 वाजता पुन्हा या विसर्गात वाढ करून तो 40 हजार क्युसेक करण्यात आला आहे. (Latest Pune News)
सध्या भीमा नदीचे पात्र सध्या पाण्याने तुडूंब भरून वाहत आहे. त्यामुळे प्रशासनाने इंदापूर, माढा, माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने, उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणदेखील पूर नियंत्रणासाठी सातत्याने कमी-जास्त करावे लागत आहे.
उजनी धरणामध्ये सोमवारी सायंकाळी 6 वाजता 121.62 टीएमसी पाणीसाठा असून, त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 57.96 टीएमसी एवढा आहे. सध्या धरणामध्ये 108.09 टक्के उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. उजनी धरणाच्या सांडव्यातून भीमेत 30 हजार क्युसेक क्षमतेने तर वीजनिर्मितीसाठी 1 हजार 600 क्युसेक याप्रमाणे नदीपात्रात सध्या एकूण 31 हजार 600 क्युसेक एवढ्या क्षमतेने विसर्ग सुरू आहे.
धरणातील पाण्यातून सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी 180 क्युसेक, बोगद्यामधून 200 क्युसेक तर मुख्य कालव्यातून 600 क्युसेक याप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, दौंड येथून सोमवारी सायंकाळी 6 वाजता उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 12 हजार 935 क्युसेक एवढा होता.