

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील दोन शास्त्रज्ञांना मानाचा शांती स्वरुप भटनागर ( Shanti Swarup Bhatnagar award) पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (एनआयव्ही,पुणे) येथे कार्यरत असलेल्या तरुण शास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा यादव आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम,पुणे) डॉ.रॉक्सी मॅथ्यु कोल यांचा समावेश आहे.
डॉ. प्रज्ञा यादव ह्या पुणे शहरातील एनआयव्हीमध्ये बायोसेफ्टी लेव्हल-4 प्रयोगशाळेच्या प्रमुख आहेत. ही प्रयोगशाळा आशिया खंडातील पहिली असून, त्यांनी कोविडच्या काळात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. सध्या त्यांच्याकडे नागपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थच्या संचालकपदाचा प्रभारी कार्यभारही आहे. केंद्र सरकारने शास्त्रज्ञांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांतील पहिला ’राष्ट्रीय विज्ञान’ पुरस्कार जाहीर केला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार संशोधकांच्या उत्कृष्ट, प्रेरणादायी वैज्ञानिक, तांत्रिक आणि नावीन्यपूर्ण योगदानासाठी दिला जाणार आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
देशातील 13 शास्त्रज्ञांना ’विज्ञान श्री’ पुरस्कार, तर 18 जणांना ’विज्ञान युवा-शांती स्वरूप भटनागर’ पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. यादव यांनी कोविड-19 महामारीच्या काळात केलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. भारतातील कोविडच्या विषाणूचे त्वरित विलगीकरण करण्याच्या दिशेने त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. ज्याचा उपयोग भारत बायोटेक इंटरनॅशनलने पहिली स्वदेशी लस (कोव्हॅक्सिन) तयार करण्यासाठी झाला होता.
डॉ. यादव या मूळच्या उत्तर प्रदेशच्या. पण, उच्च शिक्षणासाठी वीस वर्षींपूर्वी त्या पुण्यात आल्या. विद्यापीठातून डॉक्टरेट आणि त्यानंतर एनआयव्हीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. भारतातील नवे विषाणुजन्य आजार समजून घेण्यात डॉ. यादव यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक नवीन विषाणूंचा शोध लागला. क्राइमीन-काँगो हेमोरेजिक ताप, कायसनूर फॉरेस्ट डिसीज, निपाह, झिका व्हायरस यांसारख्या विषाणुजन्य उद्रेकांची त्वरित तपासणी करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
डॉ.रॉक्सी मॅथ्यु कोल हे पुणे शहरातील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम,पाषाण) येथे हवामान शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. पृथ्वी आणि अवकाश विज्ञानातील त्यांच्या उत्कृष्ट संशोधनासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी दक्षिण आशिया आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी हवामान बदलाचे अंदाज या विषयावर मोठे योगदान दिले आहे. हवामान बदलाच्या परिणामात मान्सून काळातील पूर, दुष्काळ,चक्रीवादळे,उष्णतेच्या लाटा आणि सागरी परिसंस्था यावर त्यांचे अनेक शोधनिबंध जगात प्रसिध्द झाले आहेत. इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज या समितीचे ते सध्या ते भारतीय अध्यक्ष आहेत.