

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोणावळा शहरात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो होत असल्याची बातमी बाहेर पडत असताना, याच वेळी या धरणाच्या पाण्यात एकाच कुटूंबातील 5 जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या पाचजणांपैकी चौघांचे मृतदेह मिळाले आहेत तर एकाचा अद्याप मृतदेह मिळाला नाही. शोधकार्य सुरु आहे. Lonavala waterfall mishap
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुण्यातील हडपसर येथील सैद नगर मधील अन्सारी कुटुंबातील १८ जण रविवारी (दि.३०) भुशी धरणावर पावसाळी पर्यटनासाठी गेले होते. यावेळी धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी म्हणून हे सर्वजण त्याठिकाणी गेले. दुपारी 12.30 वाजता ते या धबधब्याच्या प्रवाहात उतरले. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील एकूण 7 जण पाण्यासोबत धरणाच्या मुख्य डोहात वाहून गेले. यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यश मिळाले. मात्र, दुर्दैवाने 4 ते 13 वर्ष वयोगटातील तीन मुली व एक मुलगा तसेच एका महिला पाण्यातून बाहेर पडण्यात अपयशी ठरले.
वाहून गेलेल्या पाचजणांपैकी चौघांचे मृतदेह मिळाले आहेत, तर एकाचा मृतदेह मिळालेला नाहीत. शोध तपास सुरु आहे. वरून पडणारा मुसळधार पाऊस आणि पाण्याचा जोरदार प्रवाह यामुळे या बचाव कार्यात अडचणी येत आहे.