वालचंदनगर : निमसाखर (ता. इंदापूर) परिसरातील निरा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. परिणामी, आजु बाजूची शेतीपिके जळण्याच्या मार्गावर आली असून, शेतकरी चिंतेत आहेत. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर, रासकरमळा, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी आदी परिसरातील निरा नदीपात्र पाण्याअभावी फेब—ुवारी महिन्यापासून कोरडे पडले आहे. परिणामी, या भागातील नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेकडो एकर क्षेत्रावरील ऊस, मका, डाळिंब बागा व इतर पिके पाण्यावाचून जळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे.
शिवाय आजुबाजूच्या अनेक गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरी नदीपात्रालगत असून, या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे गावोगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याशिवाय जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वर्षानुवर्षे प्रत्येक उन्हाळ्यात नदीकाठच्या शेतकर्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याच्या मागणीकरिता गेल्या अनेक वर्षांत येथील शेतकर्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. मात्र, उन्हाळ्यामध्ये धरणातून नदीपात्राला पाणी सोडता येणार नाही, असा नियम असल्याने या भागातील शेतकर्यांवर अन्याय होत आहे. शासनाने नदीकाठच्या शेतकर्यांचा विचार करून वीर धरणातून उन्हाळी हंगामात किमान गरजेपुरते पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.