मंचर: उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पिण्यासाठी थंड पाणी आवश्यक वाटत असून, त्यासाठी माठाची गरज निर्माण झाली आहे. माठातील पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असल्याने माठाची मागणी वाढली असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहवयास मिळत आहे.
सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तीव्र उन्ह पडत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पाण्याची गरज प्रत्येक माणसाला जाणवते. थंड पाणी मिळवण्यासाठी नागरिक माठांचा तसेच फ्रिजचा वापर करत असतात.
फ्रिजच्या माध्यमातून हे थंड पाणी उपलब्ध होत असले तरी माठातील पाण्याची चव आणि आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायक असल्याने अनेक लोक माठातील पाणी पिण्याला पसंती देत आहेत. सध्या नागरिक माठ खरेदी करताना पाहवयास मिळत आहेत.
एका माठाला 250 ते 300 रुपये बाजारभाव मिळत आहे. सध्यातरी नागरिक माठ खरेदी करून या माठात पाणी साठवून पिण्यासाठी वापर करत आहेत. अनेक नागरिकांनी घरात अडगळीत ठेवलेले माठ आता पुन्हा एकदा बाहेर काढले असून, माठात पाणी साठवण्याची सुरुवात केली आहे. विजेच्या लपंडावामुळे अनेक वेळा फ्रिज असूनही त्याचा उपयोग होत नाही. त्या तुलनेत माठ कायमच थंड पाणी देत असल्याने कोणत्याही खर्चाविना माठातील पाणी उपलब्ध होत असल्याने नागरिक माठ खरेदी करत आहेत.
परप्रांतीय माठ कामगार दाखल
सध्या पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या स्थानिक माठांबरोबरच परराज्यांतून येणार्या लाल माठांना मागणी आहे. लाल माठांना नळ बसवलेला असल्याने अनेक दुकानदार लाल माठांना पसंती देत आहेत. घरगुती वापरासाठी स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या काळ्या मठांची मागणी जास्त आहे. सध्यातरी नागरिक थंड पाण्यासाठी माठांची खरेदी करत आहेत.