सर्वेक्षण सदोष; माहिती थेट सुप्रीम कोर्टाला कळविणार : चंद्रलाल मेश्राम

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाचे आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी करण्यात आलेले सर्वेक्षण हे 'मराठा' शब्दाची व्याख्या न करताच करण्यात आले. सर्वेक्षण करणार्‍या प्रगणकाला जी माहिती देण्यात आली, ती त्याने संगणक प्रणालीत भरली. त्यामुळे सर्वेक्षणाची विश्वासार्हता आणि अचूकता कोणत्याही प्रकारे तपासण्यात आलेली नाही. परिणामी, हे सर्वेक्षण सदोष असून, याबाबतची माहिती थेट सर्वोच्च न्यायालयाला कळविणार असल्याची भूमिका राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य, माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांनी शनिवारी स्पष्ट केली.

आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर मेश्राम यांनी संवाद साधला. ते म्हणाले, 'प्रगणकाला समोरच्याने दिलेली माहिती त्याने संगणक प्रणालीत भरली. हा प्रगणक स्थानिक असल्याने सर्वेक्षणाखाली त्याने वरील माहिती देणार्‍याशी सहमत आहे किंवा कसे, असा पर्याय देण्याची माझी सूचना होती. तसेच कुणबी प्रमाणपत्रे जेवढी देण्यात आली आहेत, त्यांची यादी मागून तेवढा आकडा वगळला असता, तर मराठ्यांची संख्या समोर आली होती.

हा आयोग 2021 रोजी स्थापन करण्यात आला तेव्हा राज्य सरकारने उच्च न्यायालयाला अध्यक्षपदासाठी तीन नावे पाठवा म्हणून शिफारस गेली होती. तेव्हा उच्च न्यायालयाकडून यासाठी दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागला होता. मात्र, आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला. तेव्हा एका दिवसात नव्या अध्यक्षांची नेमणूक झाली. राज्य सरकारने उच्च न्यायालयाला कधी विनंती केली आणि अध्यक्षांची नेमणूक कधी झाली, हे समोर आलेले नाही. निरगुडे यांनी आयोगाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखविली होती. मात्र, त्यांच्या राजीनाम्याचे पत्र त्यापूर्वी एक दिवसाची तारीख असलेले समोर आले.

त्यामुळे निरगुडे यांच्या राजीनाम्यातही गौडबंगाल आहे. या सर्व पार्श्वभूमीवर करण्यात आलेले हे सर्वेक्षण सदोष असून, हे मी सर्वोच्च न्यायालयाला थेट कळविणार आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात तरून जाईल; मात्र सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. दरम्यान, सर्वेक्षणाआधी मराठा आरक्षणाबाबत सामान्य नागरिकांकडून हरकती, सूचना मागविल्या होत्या. 3075 हरकती, सूचना आल्या होत्या. या हरकती, सूचनांचे विरोधातील, समर्थनार्थ अशी वर्गवारी करण्यात आली. त्यावर ही काही जनमत चाचणी नसून या आधारावर आर्थिक मागासलेपण सिद्ध करता येत नाही. त्यामुळे हरकती, सूचनांवर आयोगाने अभिप्राय नोंदवून अहवाल तयार करावा. उपसमितीने तो पुनर्लेखन करायला हवा, अशी सूचना मी मांडली होती. मात्र, अध्यक्षांनी त्यावर वेळ कमी असल्याचे सांगून नकार दिला. राज्य सरकारला अहवाल कोणत्याही सदस्याला दाखविण्यात आला नाही, त्याची प्रतही दिलेली नाही.

आरक्षण रद्द होईपर्यंत सत्ताधार्‍यांचा उद्देश सफल झाला असेल

आयोगाकडून राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात आला आहे. स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करणारा आहे. स्वतंत्र आरक्षण द्यायचे झाल्यास खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकाचे (ईडब्ल्यूएस) उपवर्गवारी करून देता येऊ शकते किंवा स्वतंत्र दहा-बारा टक्के आरक्षण द्यायचे झाल्यास 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी घटनेत बदल करावा लागेल. त्यामुळे स्वतंत्र आरक्षणाचा तिढा सोडविणे इतके सहजशक्य नाही. निवडणुकीच्या तोंडावर विशेष अधिवेशन बोलावून सरकार कायदा करून मोकळे होईल आणि या आधारावर निवडणुका होतील. त्यामुळे आरक्षण भविष्यात रद्द झाले, तरी सत्ताधार्‍यांचा उद्देश तोवर सफल झालेला असेल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news