

प्रा. अनिल धुमाळ
बारामती : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीचे राजकीय पटलं पूर्णपणे बदलले आहे, बारामतीची पोटनिवडणूक केवळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाची औपचारिकता नसून अजित पवार यांच्या सावलीत मोठे झालेल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची खरी कसोटी सुनेत्रा पवार यांना किती मोठे मताधिक्य मिळणार यात लागणार आहे.अजितदादा असताना त्यांच्या दरबारात हजेरी लावून 'चमकोगिरी'करणाऱ्या नेत्यांची आणि स्वतःला 'दादांचे खास'म्हणवून घेणाऱ्या कार्यकर्त्यांची खरी परीक्षा आता सुनेत्रा पवार यांच्या पोटनिवडणुकीत होईल.
काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्याने ही निवडणूक आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी केवळ औपचारिकता उरली आहे, असे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात २२ अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने मतदान होणारच आहे. अशावेळी मतदानाचा टक्का वाढवणे आणि विक्रमी मतांनी सुनेत्रा पवार यांना निवडून आणणे यासाठी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची कसोटी लागणार आहे.
दिवंगत अजितदादांची निवडणुकीची रणनीती ही नेहमीच 'मायक्रो मॅनेजमेंट'वर आधारित असायची. प्रत्येक बुथवर दादांना मानणारा आणि त्यांच्यासाठी अहोरात्र काम करणारा एक वर्ग आहे, पण या पोटनिवडणुकीत, दादांचे नाव घेऊन स्वतःचे हित जपणारे आणि प्रत्यक्ष जमिनीवर घाम गाळणारे कार्यकर्ते यांच्यातील फरक स्पष्टपणे जाणवणार आहे. ज्या बुथवर मताधिक्य घटेल,तिथला नेता आणि कार्यकर्ता केवळ'दादगिरी'करत होता की 'कामगिरी' हे जनतेसमोर आणि सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार यांच्या समोर उघड होणार आहे.
अजितदादांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी भावनिक लाट आहे, हे मान्य,पण केवळ सोशल मीडियावर पोस्ट टाकून किंवा बॅनरबाजी करून दादांचे प्रेम व्यक्त होत नाही. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात जो कार्यकर्ता घराघरात जाऊन मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणेल,तोच खरा 'दादांचा निष्ठावंत' ठरेल. कार्यकर्त्यांचा उत्साह हा केवळ नेत्यांच्या समोर दिसतो की तो मतपेटीतून उतरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता चेंडू कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक नेत्यांच्या दरबारात आहे,ते दादांच्या आठवणींना केवळ भावनेपुरते मर्यादित ठेवतात की विक्रमी मताधिक्याने वहिनींना निवडून देऊन दादांना खरी श्रद्धांजली अर्पण करतात, हे निकालच सांगेल.
अजितदादांच्या सत्तेच्या आणि प्रभावाच्या काळात अनेक नेत्यांनी स्वतःची राजकीय दुकाने थाटली. दादांच्या पुढे-पुढे करून स्वतःची कामे करून घेणारी एक मोठी फळी बारामतीत तयार झाली होती, आता हीच मंडळी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात त्याच जोमाने उतरणार का? की दादांच्या अनुपस्थितीत हे नेते 'सुस्त' होणार, यावर लक्ष असणार आहे.? वहिनींना मिळणारे मताधिक्य हे या नेत्यांच्या कर्तृत्वाचे'रिपोर्ट कार्ड' ठरणार आहे.
बारामतीच्या राजकारणात दादा म्हणजे एक'वटवृक्ष' होते. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली ही पोकळी भरून काढण्यासाठी आता दुसऱ्या फळीतील नेत्यांना स्वतःला सिद्ध करावे लागेल.केवळ दादांच्या नावावर मते मागण्यापेक्षा, आम्ही दादांच्या विचारांचे शिपाई म्हणून खंबीर आहोत, हे कृतीतून दाखवण्याची हीच ती वेळ आहे. यात किती यशस्वी होतात हे पहावे लागेल.
सत्ता आणि पद असताना अवतीभवती फिरणारे शेकडो असतात, पण संघर्षाच्या वेळी जो खंबीरपणे उभा राहतो, तोच खरा निष्ठावंत. बारामतीची ही पोटनिवडणूक अशाच ''संधीसाधू'' आणि ''निष्ठावंत'' लोकांमधील पडदा दूर करणारी ठरणार आहे. दादांच्या शब्दावर चालणाऱ्या बारामतीत आता 'दादा' नाहीत, अशा वेळी कोण प्रामाणिकपणे 'ग्राऊंड लेव्हल'ला काम करतो आणि कोण केवळ फोटोपुरता मर्यादित राहतो, याचे चित्र या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.