पुणे : जिल्ह्यातील संपलेला ऊसगाळप हंगाम 2023-24 मध्ये सर्व 14 साखर कारखान्यांनी उसाची रास्त आणि किफायतशीर किमतीची (एफआरपी) शंभर टक्के रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. शेतकर्यांना सुमारे 116.42 टक्क्यांइतकी एफआरपीची रक्कम कारखान्यांनी दिलेली असून, ती 3 हजार 755 कोटी रुपये आहे. देय एफआरपीपेक्षा सुमारे 530 कोटी अधिक जमा करण्यात आल्याचे पुणे प्रादेशिक साखर सह संचालक कार्यालयातून सांगण्यात आले. चौदापैकी 13 कारखान्यांनी शंभर टक्क्यांहून अधिक रक्कम शेतकर्यांना दिली आहे. त्यामुळे संपलेल्या ऊसगाळप हंगामाची सांगता अधिक गोड झाली आहे.
एफआरपीच्या 30 एप्रिलअखेरच्या अहवालानुसार ताजी आकडेवारी उपलब्ध झालेली आहे. कारखान्यांनी हंगामात तब्बल एक कोटी 32 लाख 95 हजार 627 टन उसाचे गाळप पूर्ण केले. त्यानुसार एकूण देय एफआरपीची रक्कम 3 हजार 225 कोटी 54 लाख रुपये होती. तर प्रत्यक्षात कारखान्यांनी 3 हजार 755 कोटी 34 लाख रुपये शेतकर्यांना दिलेले आहेत. बहुतांशी कारखान्यांनी देय एफआरपी रकमेपेक्षा अधिकची एफआरपीची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा केलेली आहे.
हेही वाचा