

पुणे: राज्यातील संपलेल्या ऊसगाळप हंगाम 2024-25 मध्ये तब्बल 222 लाख मेट्रिक टनाइतके कमी ऊसगाळप झालेले आहे. त्यामुळे राज्यातील साखर उद्योगास सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी पत्रकारांना दिली.
साखर कामगार त्रिपक्षीय करारासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, साखर उद्योगाचा दरवर्षीचा हंगाम कालावधी सरासरी 160 ते 180 दिवस राहतो. मात्र, संपलेल्या ऊसगाळप हंगाम 2024-25 मध्ये सरासरी 83 दिवस साखर कारखाने चालले. गतवर्ष 2023-24 च्या तुलनेत संपलेल्या हंगामात सुमारे 222 लाख टनांनी ऊसगाळप कमी झाला. त्याचा विपरित परिणाम होऊन 30 लाख मेट्रिक टनांनी यंदाच्या हंगामात साखर उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे साखर उद्योगाचे उत्पन्न 12 हजार कोटींनी कमी झालेले आहे.
साखर उद्योगाकडून उपपदार्थांचेही मोठे उत्पादन होते. त्यामध्ये अल्कोहोल, इथेनॉल, बगॅस आदींचाही समावेश आहे. या उत्पादनातही ऊसाच्या कमी गाळपामुळे मोठी घट झाली. त्यातून उद्योगास तीन हजार कोटी रुपये कमी मिळालेले आहेत. म्हणजेच साखर कारखान्यांच्या गाळपक्षमतेचा पुरेपूर वापर झाला नाही आणि हंगाम कालावधी लक्षणीयरीत्या घटला आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचे पाटील म्हणाले.
साखर आयुक्तालयाच्या प्राप्त माहितीनुसार, हंगाम 2024-25 मध्ये 853.96 लाख मेट्रिक टन ऊसगाळप पूर्ण झाले. ते याआधीच्या वर्षीच्या हंगामात (2023-24) 1076 लाख मे.टन झाले होते. तर यंदा साखर उत्पादन 80.94 लाख मेट्रिक टन झाले. जे गतवर्षी 110.44 लाख मेट्रिक झाले होते.