

मंचर : पुढारी वृत्तसेवा : रोजगार मिळविण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण घेणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे, असे आवाहन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुका विद्या विकास संचालित बी. डी. काळे महाविद्यालय, घोडेगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात रविवारी (दि. 4) ते बोलत होते.
या वेळी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, माजी सभापती संजय गवारी, प्रकाशराव घोलप, विघ्नहरचे संचालक यशराज काळे, सरपंच अश्विनी तिटकारे, सोमनाथ भाऊ काळे, रत्नाताई गाडे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, उपाध्यक्ष शाम होनराव, जयसिंगराव काळे, अॅड. मुकुंद काळे, अजित काळे, शरद बँकेचे संचालक सुदाम काळे, प्राचार्य ज्ञानेश्वर वाल्हेकर, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वतःमधील गुणांचा शोध घेऊन आपल्या करिअरची दिशा निश्चित करावी. आपल्यातील सुप्त कौशल्य अगोदरच ओळखणे गरजेचे आहे. आज विविध क्षेत्रात कौशल्याला महत्त्व प्राप्त झाल्याने.
पारंपरिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण अंगिकारणे आवश्यक आहे. पालकांनी विद्यार्थ्यांची आवड आणि त्यांचे कौशल्य विचारात घेऊन त्यांना करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. याबाबत विद्यार्थ्यांचे शाळेत आणि घरी समुपदेशन करावे. विद्यार्थांना सक्ती न करता त्यांना आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. वळसे पाटील म्हणाले, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ या संस्थेची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. अभिमन्यू काळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. वळसे पाटील यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक गणेश काळे, सूत्रसंचालन पुरुषोत्तम काळे यांनी केले. आभार तुकाराम काळे यांनी मानले.
हेही वाचा