पुणे : पाण्याची गळती रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेने स्मार्ट एएमआर मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत हे मीटर बसविले जात आहेत. पालिकेतर्फे ऑगस्ट महिन्यात या योजनेतील उर्वरित 77 हजार पाणी मीटर बसविले जाणार होते. मात्र, दोन महिने पूर्ण होऊनही केवळ 6 हजार मीटर पाणीपुरवठा विभागाने बसविले आहेत. पाणीमीटरला नागरिकांचा विरोध होत असल्याने हे काम संथगतीने सुरू असल्याचे पालिकेच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. विरोध करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार होते. मात्र, त्यासाठी देखील कर्मचारी पुढे येत नसल्याने ‘स्मार्ट मीटर’चा सावळागोंधळ सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे. (Latest Pune News)
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेत बैठक घेतली होती. यात पाण्याची गळती रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश त्यांनी पालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याचे मीटर बसविण्याचे काम महिन्याभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, ऑगस्ट महिना संपून सप्टेंबरदेखील निम्मा झाला आहे, तरी 77 हजारपैकी केवळ 6 हजार मीटर बसवून झाले आहेत. या योजने अंतर्गत 1 लाख 85 हजार मीटर बसविण्यात आले आहेत. तर आणखी 71 हजार मीटर बसविण्याचे बाकी आहेत. हे मीटर बसविण्यासाठी निश्चित कालावधीदेखील महापालिकेने ठेवला नसल्याने हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर योजनेचा बोजवारा उडण्याच्या मार्गावर आहे. महापालिकेतर्फे समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात 83 पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत.
1 हजार किलोमीटरहून अधिक जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. पाण्याच्या 65 हून अधिक टाक्यांचे काम झाले आहे. मात्र, काही जलवाहिन्यांचे काम अडल्यामुळे बाकी आहे. व्यावसायिक, तसेच निवासी मिळकतींवर बसविण्यात येणार्या मीटरद्वारे मानकानुसार पाणी पुरवठा करणे व अतिरिक्त पाणी वापरास प्रतिबंध आणून गळती रोखणे आणि उपलब्ध पाण्याचे सर्वच भागात वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
योजनेच्या प्राथमिक आराखड्यात मिळकतकर विभागाकडील नोंदींनुसार सव्वातीन लाख मीटर बसविण्यात येणार होते; परंतु यानंतर ही संख्या दोन लाख 90 हजारांपर्यंत कमी झाली. आता महापालिकेने ग्राहक सर्वेक्षणानुसार 2 लाख 63 हजार मीटर बसवावे लागतील, असे निश्चित केले आहे. यामध्ये पाच टक्के वाढ गृहीत धरण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 85 हजार मीटर बसविण्यात आले आहेत. उर्वरित साधारण 77 हजार मीटर बसविण्याचे काम अद्याप बाकी होते. यातील केवळ 6 हजार मीटर बसविले गेले आहेत. हे मीटर बसवण्यासाठी मुख्य कंपनीने पाच ठेकेदारांची नियुक्ती केली असून, प्रत्येक ठेकेदाराने महिनाभरात 15 हजार मीटर बसवावेत, असा आदेश देण्यात आला होता. मात्र, हे काम संथ गतीने सुरू आहे.
पुण्यात पाण्याची गळती रोखण्यासाठी व पाण्याचा समान वापर करण्यासाठी ‘समान पाणीपुरवठा योजना’ पालिकेने आणली. या योजनेतूनच हे स्मार्ट मीटर बसविले जाणार होते. मात्र, मीटर बसविण्यात आले नसल्याने पालिकेला पूर्ण क्षमतेने बिल आकारता येत नसून, पाण्याची गळतीदेखील रोखण्यास पाणी पुरवठा विभागाला अपयश आले आहे.
शहरात 40 टक्के पाणीगळती होते. मीटरनुसार पाणीपुरवठा केल्यास अतिरिक्त पाणीवापर कमी होऊन प्रत्यक्ष गळती रोखण्यास मोठी मदत होणार आहे. यामुळे ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही, त्या भागाला पाणी पुरविणे शक्य होणार आहे. प्रामुख्याने मध्यवर्ती पेठा, कोथरूड, धनकवडी, कात्रज, ससाणेनगर, येरवड्यातील आंबेडकरनगर, मार्केट यार्ड येथे पाणी मीटर बसविण्यास विरोध होत आहे.