खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड, राजगड किल्ल्यावर रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी साडेपाचनंतर सिंहगड परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने माघारी जाताना पर्यटकांना वर्षाविहाराचा सुखद आनंद मिळाला. खडकवासला धरण चौपाटीसह पानशेत परिसरातही पर्यटकांची सकाळपासून वर्दळ सुरू होती.
सिंहगडावर दिवसभरात 1 लाख 19 हजार रुपयांचा टोल वन विभागाने वाहनचालक पर्यटकांकडून वसूल केला. सिंहगड किल्ल्यावर वीस हजारांहून पर्यटकांनी हजेरी लावली. दिवसभरात गडावर 599 चारचाकी व 1 हजार 118 दुचाकी, अशी एकणू 1717 वाहने आल्याची नोंद झाली. गडावर सकाळपासून पर्यटकांची वर्दळ होती. दुपारी कडक उन्हामुळे पर्यटकांची संख्या रोडावली. सिंहगड वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांच्या देखरेखीखाली संदीप कोळी, नितीन गोळे, रोहित पढेर, नीलेश पायगुडे, संतोष पढेर, गणेश सांबरे, मंगेश गोफणे आदी सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन तळपासून टोल नाक्यापर्यंत धावपळ करत होते.
सायंकाळी पाचपासून पुण्याकडे माघारी जाणार्या वाहनांची वाहतूक वाढल्याने पुणे -पानशेत रस्त्यावर खानापूर, डोणजे, गोर्हे आदी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. तसेच खडकवासला धरण चौपाटी परिसरातही वाहतूक मंदागतीने सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, राजगडावर दिवसभरात दोन ते अडीच हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिल्याचे पुरातत्व विभागाचे पाहरेकरी बापू साबळे यांनी सांगितले.
हेही वाचा