

शिरूर: लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने संबंधित महिलेच्या तीन वर्षांच्या निष्पाप बालकाची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची घटना कारेगाव (ता. शिरूर) येथे उघडकीस आली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी मध्य प्रदेशातील संशयित तरुणाला गुरुवारी (दि. १८) पहाटे अटक केली आहे. अंशू पप्पू कोल (वय ३ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे.
याप्रकरणी मुलाची आई राणी पप्पू कोल (वय २५, रा. कारेगाव, मूळ रा. मध्य प्रदेश) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित देवांशू आदित्य साहू (वय २४, रा. बरटोला, ता. जि. अनुपपूर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राणी कोल या कारेगाव येथील कल्याणी कंपनीच्या पाठीमागील परिसरात भाड्याच्या खोलीत राहतात. आरोपी देवांशू साहू याने राणी यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकला होता.
मात्र, राणी यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांकडे सोडून देण्यास आणि देवांशसोबत लग्न करण्यास ठाम नकार दिला. याच नकाराचा राग मनात धरून देवांशू याने बुधवारी (दि. १७) दुपारी १२.३० ते सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरात कोणी नसताना तीन वर्षीय चिमुरड्या अंशू याला अमानुष मारहाण केली.
या मारहाणीत बालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.