मला राजकीय भूमिका घ्यावी लागली,ती शरद पवार यांना सांगूनच घेतली. सुरुवातीला ते हो म्हणाले, नंतर म्हणाले की ही भूमिका मला घेता येणार नाही, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी स्पष्टोक्ती केली. बारामती येथे आयोजित डाॅक्टर व वकिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, पुरुष मंडळी एक आहेत तोपर्यंत घर चांगले असते. भावा-भावात चांगले चाललेले असते. परंतु एकदा का..... असे शब्द उच्चारात त्यांनी पुढील बोलणे थांबवले आणि... त्यानंतर मग घरातील सूर बदलतो असे ते म्हणाले.
मधल्या काळात मी पक्के ठरवले होते की आत्ता बस्स झाले. मी तशी वक्तव्ये केली होती. कधी ना कधी थांबावं लागते. पण लोकांच्या रेट्यामुळे काही गोष्टी कराव्या लागतात, या शब्दात त्यांनी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातील उमेदवार देणे ही माझी चूक होती, मी ती मान्यही केली. लोकसभेला सुप्रिया यांनाच मतदान करण्याची बारामतीकरांची मानसिकता होती असे ते म्हणाले.
पुढील आठवड्यात राज्यात आचारसंहिता सुरु होईल असे संकेत पवार यांनी दिले. आता होणारी कॅबिनेट अखेरचीच असेल, असे सांगून ते म्हणाले, आम्ही विकासासाठी सत्तेत गेलो. लोकसभेला काय झाले त्यावर मला बोलायचे नाही. काही नरेटीव्ह सेट केला गेला, त्याचा जबर फटका आम्हाला बसला. तरीही तिसऱयांदा मोदी पंतप्रधान होणे गरजेचे होते, ते झाले.
हरीयाणात एक्झिट पोल फेल ठरले. त्यामुळे पोलवर विश्वास ठेवायचे कारण नाही. वन साईड भाजपचे सरकार तिथे आले. राज्यातही पुढील काळात महायुतीची सत्ता येईल असे ते म्हणाले.