पुणे: पावसाळ्यात खडकवासला धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यानंतर, सिंहगड रोड परिसरातील एकतानगरीत पाणी शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी, पुणे महानगरपालिका प्रशासन या भागातील मुठा नदीच्या काठावर नदी सुधारणा प्रकल्पांतर्गत उपाययोजना करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे.
पुढील पावसाळ्यापूर्वी एकता नगरीच्या काठावर नदी सुधारणा प्रकल्पांतर्गत वडगाव खुर्द ते राजाराम पूल स्ट्रेच 6 चे काम सुरू करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या कामासाठी, महानगरपालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन निधीतून 300 कोटी रुपयांची मागणी केली आहे. (Latest Pune News)
गुजरातच्या साबरमती नदीच्या धर्तीवर, पुणे महानगरपालिकेकडून शहरातील मुळा- मुठा नदीकाठाच्या जीर्णोद्धार आणि सुशोभीकरणाचे काम पाच हजार कोटी रुपयांच्या नदी सुधारणा प्रकल्पासाठी सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत शहरातून वाहणार्या मुळा- मुठा नदीकाठच्या 44 कि.मी. लांबीच्या भागाचे साबरमती नदीच्या धर्तीवर सुशोभीकरण केले जात आहे.
या प्रकल्पाचे काम एकूण 11 टप्प्यात केले जाणार आहे. यापैकी तीन टप्प्यांचे काम प्रगतीपथावर आहे. संगमवाडी ते बंडगार्डन (पट्टा 9), बंडगार्डन ते मुंढवा (पट्टा 10) आणि वाकड ते सांगवी पूल (पट्टा 11) या मार्गावर काम सुरू झाले आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात शहरातील एकतानगरी, निंबाजनगर, विठ्ठलनगरमध्ये पुराचे पाणी शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
गेल्या वर्षीही पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले होते. शहरातील एकतानगर, निंबाजनगर, विठ्ठलनगर वसाहत परिसर पाण्याखाली गेला होता.
परिसरातील सोसायट्या 8 ते 9 फूट पाण्याखाली गेल्या होत्या. अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेकडो कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले. दरवर्षी येणार्या पुराची समस्या संपवण्यासाठी प्रशासनाने तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर येथे क्लस्टर बांधण्याची योजना आखली होती. परंतु, प्रत्यक्षात हे शक्य नसल्याचे पाहून प्रशासनाने येथे नदी सुधारणा प्रकल्पांतर्गत काम प्रथम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
राज्य सरकारकडे 300 कोटी रुपयांची मागणी
धरणातून सोडले जाणारे पाणी शहरी भागात जाऊ नये म्हणून, वडगाव खुर्द ते राजाराम पूल या 4.10 कि.मी. लांबीच्या भागाचे काम नदी सुधारणा प्रकल्पांतर्गत तातडीने सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. या कामासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत राज्य सरकारकडे 300 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. या कामाचा अंदाज काढण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर निविदा काढण्यात येईल, असे महानगरपालिकेच्या अधिकार्याने सांगितले.
...त्यानंतर पाणी शहरी भागात जाणार नाही
वडगाव खुर्द ते राजाराम पूल (स्ट्रेच-6) या भागाची एकूण लांबी 4.10 कि.मी. आहे. या भागाच्या दोन्ही काठांवर बंधारे, वृक्षारोपण, सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक आणि नाले विकसित केले जातील. हे काम पूर्ण झाल्यानंतर नदीकाठचा परिसर सुरक्षित राहील आणि पाणी आजूबाजूच्या शहरी भागात जाणार नाही.