दिवाळी विशेष पुणे विभागातून सोडण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्या यंदा हाउसफुल झाल्याचे समोर आले आहे. यंदा रेल्वे प्रशासनाकडून 182 गाड्या दिवाळीनिमित्त सोडण्यात आल्या आहेत. या सर्वच्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेत रेल्वेने अतिरिक्त गाड्यांची मागणी रेल्वे बोर्डाला केली आहे.
रेल्वे च्या माध्यमातून सणासुदीला बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. विविध सणांना मिळालेल्या सुट्ट्या यामुळे अनेक नागरिक रेल्वेच्या माध्यमातून गावी जातात. नागरिकांच्या सुविधा साठी रेल्वे कडूनही त्या त्या वेळेत अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केले जाते. गणपती होळी शिमगा यासाठी देखील रेल्वे प्रशासनाने ज्यादा गाड्या सोडल्या होत्या. याप्रमाणेच आता रेल्वे प्रशासनाने दिवाळीनिमित्त 182 जादा गाड्यांची नियोजन केले होते.
दिवाळी सणापूर्वीच या गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. आणि आणखी दिवाळी विशेष गाड्यांसाठी प्रवाशांची मागणी वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले जात आहे. या गाड्या राज्यासह संपूर्ण देशभरात प्रवासी सेवा पुरवणार आहेत यात बिहार कोलकत्ता आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यासह कोकण भाग व दक्षिण भारतात देखील धावणार आहे. खास करून या गाड्या दानापूर, गोरखपूर, राजस्थानमधील जयपूर या भागात सोडण्यात आले आहे. दिवाळीच्या आगामी काळात काही दिवस अगोदर या गाड्या सोडल्या जातील.
प्रवाशांच्या सोयीसाठी आम्ही दिवाळी विशेष 182 गाड्या सोडल्या आहेत या सर्व गाड्यांची आरक्षण फुल झाले आहे. प्रवाशांसाठी आणखी गाड्यांची आवश्यकता असल्यामुळे, त्यानुसार आम्ही मुख्यालयाला मागणी केली आहे.
डॉ. मिलींद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग