पुणे : जगभरामध्ये अनेक राजे आणि संस्थानिक होऊ गेले. मात्र, तीनशे वर्षांनंतरही ज्या राजाची जयंती एवढ्या उत्साहाने साजरी केली जाते, तो राजा केवळ छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कोणी कितीही खोटे संभ्रम निर्माण करून शिवरायांचा इतिहास चुकीचा सांगण्याचा प्रयत्न केला तरी राजमाता जिजाऊंनीच छत्रपती शिवरायांना घडविले, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले.
अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, सचिव विराज तावरे, प्रशांत धुमाळ, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, मंदार बहिरट, मयूर शिरोळे, सतीश शेलार, सारिका पासलकर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पवार म्हणाले की, आपल्या देशामध्ये अनेकांचे राज्य झाले असून, त्यांनी त्यांच्या नावाचा वापर केला. मात्र, छत्रपती शिवरायांनी भोसलेंचे राज्य नव्हे तर रयतेचे राज्य म्हणून वाढविले. मात्र, काही व्यक्ती संभ्रम निर्माण करून विनाकारण विषारी विचार पसरविण्याचे काम करीत असून, अशा व्यक्तींकडे सर्वसामान्यांनी दुर्लक्ष करून छत्रपती शिवरायांच्या विचारांची कास धरावी. प्रास्ताविक विकास पासलकर यांनी केले. सूत्रसंचालन विराज तावरे यांनी केले.
प्रशांत धुमाळ यांनी आभार मानले. या प्रसंगी सहा 'आदर्श माता-पिता' पुरस्कार प्रदान करण्यात आले. निवडणुका आल्या की भाजपला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. मात्र, आज शिवजयंती असल्याने मोदी महाराष्ट्रात येतील, असे वाटले होते. परंतु, ते आले नाहीत, अशी टीका करीत सुप्रिया सुळे म्हणाल्या, कांदा निर्यातबंदीचा निर्णय उठविण्यात आलेला आहे. सातत्याने संसदेत केलेले भाषण आणि रस्त्यावरील लढाई, याचे हे यश आहे. हे सरकार शेतकर्यांना वार्यावर सोडणारे सरकार आहे. परंतु, आमच्या लढ्याचे हे यश असल्याचे म्हणत अजित पवार यांना या वेळी टोला लगावला.
हेही वाचा